पुणे ( दि १७): आपले जीवनमान उंचावण्यासाठी तसेच सुदृढ आरोग्यासाठी परिसराची स्वच्छता अत्यंत गरजेची आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला स्वच्छ भारत मिशनचे प्रेरणादायी अभियान दिले आहे. शहराची स्वच्छता ही केवळ सरकारची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. विद्यार्थी जर घर, शाळा व सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ ठेवण्याचा संकल्प करतील, तर देश निश्चितच सशक्त बनेल, अशी भावना महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केली आहे. पुण्यामध्ये साडेसात हजार विद्यार्थ्यांनी स्वच्छतेचे सामूहिक शपथ घेतली या कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त कसबा मतदारसंघाचे आमदार हेमंत रासने यांच्या संकल्पनेतून स्वच्छ सुंदर विकसित कसबा मिशन व डेक्कन एज्युकेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने ७५०० विद्यार्थ्यांनी स्वच्छतेची सामूहिक शपथ घेतली. यावेळी पार पडलेल्या कार्यक्रमास माजी केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर, भाजप प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम, आमदार विक्रांत पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष अशोक पलांडे, भारतीय जनता पक्षाचे प्रमुख पदाधिकारी, डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे पदाधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक आणि विद्यार्थी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हेमंत रासने म्हणाले, ”२०४७ साली आपला देश विकसित करण्याचे पंतप्रधान मोदींचे स्वप्न आहे. त्यांना अपेक्षित असलेले स्वच्छ भारत मिशन प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रत्येकाने सहभाग नोंदवला पाहिजे. ‘स्वच्छ, सुंदर विकसित कसबा’ हा उपक्रम म्हणजे केवळ स्वच्छतेची शपथ नाही, तर समाजाला दिलेला संदेश आहे. मोदीजींच्या पुढील वाढदिवशी आपण पुणे शहर देशातील क्रमांक एक स्वच्छ शहर बनवू, हा संकल्प आज विद्यार्थ्यांसह केला आहे”.


