Sunday, August 30, 2026
Google search engine
HomeUncategorizedमहिला सबलीकरण व सशक्तीकरण करण्याकरिता पुरुषांनी पुढे येण्याची गरज- - विभागीय...

महिला सबलीकरण व सशक्तीकरण करण्याकरिता पुरुषांनी पुढे येण्याची गरज- – विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार

पुणे, दि. 24 ( जिमाका वृत्तसेवा ) शासकीय कार्यालयातील महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांकरिता जिल्हा परिषदेच्यावतीने आयोजित आरोग्य शिबीरात महिलांची आरोग्य विषयक तपासणी करणे ही महत्वाची बाब आहे. समाज माध्यमांवर मोफत सल्ला देणाऱ्यांचे अक्षरशः पीक आलेले आहे, त्यामुळे योग्य तज्ज्ञ व्यक्तीचा सल्ला घ्या, जीवनमान उत्कर्षमय झाल्याशिवाय राहणार नाही. ‘स्वस्थ नारी सशक्त परिवार’ अभियानात सर्व पुरुषांने महिलांच्या खांद्याला खांदा लावून साथ दिली तरच महिला सबलीकरण व सशक्तीकरण होईल, असे प्रतिपादन विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी केले.

 

 

 

‘स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान’ अंतर्गत श्री शरदचंद्र पवार सभागृह, यशवंतराव चव्हाण भवन, जिल्हा परिषद येथे शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना असंसर्ग आजाराविषयी व्याख्यान, प्राथमिक आरोग्य तपासणी, निदान व उपचार शिबाराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील,अतिरिक्त उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकांत खरात, भूषण जोशी, प्रकल्प संचालक शालिनी कडू, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रामचंद्र हंकारे, अति. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सांळुके, एशियन सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलचे संचालक डॉ. ओमकार थोपटे, प्रादेशिक मानसिक रुग्णालयाच्या मानसोपचार तज्ज्ञ डॉ. शमा राठोड यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

 

 

 

श्री. पाटील म्हणाले, जिल्ह्यामध्ये एक लाख एक हजार एकल महिला असून महिलांना प्राधान्याने लोकल्याणकारी योजनांचा लाभ देवून समानता सिद्ध करावी. तसेच या महिलांना आयुष्मान भारत, महात्मा ज्योतिराव फुले आरोग्य योजनेअंतर्गत ओळखपत्र वितरित करुन शंभर टक्के उद्दिष्ट पूर्ण करावे. आगामी काळात जिल्हा परिषद येथे अधिकारी-कर्मचारी वर्गासाठी व्यायामशाळेची व्यवस्था करण्याचा मानस व्यक्त केल. ‘स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानाअंतर्गत जिल्ह्यात आयोजित शिबीराबाबत श्री. पाटील यांनी समाधान व्यक्त केले.

 

 

 

श्रीमती कडू म्हणाल्या, महिलांनी स्वतःचे कर्तुत्व सिद्ध करत असताना कसल्याही प्रकारच्या दबावाखाली न नेता काम केल्यास जीवनात उत्तम बदल घडून येण्यास मदत होईल, असेही श्रीमती कडू म्हणाल्या.

 

 

 

डॉ. हंकारे यांनी आपल्या प्रस्ताविकात ‘स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान’ अंतर्गत जिल्ह्यातील सर्व महिला व बालकांचे आरोग्य सक्षमीकरण करणे अभियानाचा प्रमुख उद्देश आहे. महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कार्यालयीन कामकाज, वैयक्तिक व कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे आरोग्याकडे दुर्लक्ष होते. परिणामी त्यांच्या कार्यक्षमतेवर विपरीत परिणाम होतो. या शिबिरात एकाच ठिकाणी विविध वैद्यकीय विशेषज्ञांच्या सेवा उपलब्ध होत असल्याने त्यांच्या आरोग्य विषयक समस्यांचे वेळेत निदान व उपचार होण्यास मदत होणार आहे. यामुळे सकारात्मक परिणाम होत त्यांच्या कार्यक्षमता वाढ होण्यास मदत होईल, असेही डॉ. हंकारे म्हणाले.

 

 

 

डॉ. थोपटे म्हणाले, स्त्री सशक्तीकरणासोबतच स्त्रियांचे आरोग्य सुंदर सदृढ ठेवायचे असल्यास स्त्रियांनी स्वतःच्या आरोग्याकडे प्राधान्य लक्ष द्यावे. लहानापासून हृदयरोग कसे टाळू टाळता येईल, तसेच दैनंदिन जीवन जगतांना व आहार-विहारबद्दल डॉ. थोपटे यांनी मार्गदर्शन केले

 

 

 

डॉ. राठोड म्हणाल्या, समाज माध्यमांचा कमीत कमी वापर केल्यास कुटुंबात आनंदी जीवन जगता येते, काम करतांना नेहमी आनंदी मनाने काम करावे. त्यांच्या आपल्या कार्यशैलीवर सकारात्मक परिणाम होतो. नारीशक्ती, नवरात्र महोत्सव व ‘स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान’ संयुक्तपणे राबविण्याचे आवाहन त्यांनी केले.

 

 

 

यावेळी क्षयरोग (टीबी) मुक्त भारत अभियानाची शपथ सर्व उपस्थितांना देण्यात आली.

 

 

 

‘स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानाची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी

 

 

 

‘स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानाअंतर्गत आज अखेर 1 हजार 829 शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये 7 हजार 235 बालक, 10 हजार 123 गरोदर माता, 11 हजार 260 महिलांची तपासणी करण्यात आली. पोषण समुपदेशन -१७ हजार ८५८ , कर्करोग स्क्रीनिंग १७ हजार ७१३ , सिकलसेल -८१, उच्च दाब १ लाख १ हजार १९१, मधुमेह-९६ हजार ६९४, नाक कान घसा आणि जिरियाट्रिक केअर ७ हजार २०६, क्षयरोग ११ हजार ५४४, हिमोग्लोबिनबाबत 5 हजार 390 महिलांची चाचणी, तसेच प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, प्रधानमंत्री वयवंदना योजना २ हजार ६९, आयुषमान कार्ड 4 हजार 354 ओळखपत्राचा लाभ देण्यात आला आहे.

 

 

 

 

 

आज झालेल्या शिबीरात २०२ महिलांची आरोग्य तपासणी

 

 

 

या शिबीरात एकूण २०२ महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यामध्ये हृदयरोग, मधुमेह, उच्च रक्तदाब, कर्करोग या असंसर्गजन्य रोगाची तपासणी, रक्तअल्पता, पोषण मार्गदर्शन, स्त्रीरोग तपासणी व संदर्भ, ताणतणाव व्यवस्थापन, नैराश्य, चिंताविकार, सल्ला व मार्गदर्शन मानसिक आरोग्य व समुपदेशन आणि प्राथमिक प्रयोगशाळा तपासण्या, औषधोपचार, गंभीर आजार निदर्शनास आल्यास पुढील उपचारासाठी संदर्भित करण्यात आले.

 

00000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments