Sunday, August 16, 2026
Google search engine
HomeUncategorizedआठव्या आंतरराष्ट्रीय एशिया इकॉनॉमिक डायलॉग चे फेब्रुवारी २९, ते मार्च २,...

आठव्या आंतरराष्ट्रीय एशिया इकॉनॉमिक डायलॉग चे फेब्रुवारी २९, ते मार्च २, २०२४ दरम्यान पुण्यात आयोजन

भारतीय परराष्ट्र मंत्रालय व पुणे इंटरनॅशनल सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या या परिसंवादाची ह्या वर्षाची संकल्पना ‘वाढत्या प्रवाहाच्या युगात भौगोलिक व आर्थिक आव्हाने’

* तीन दिवसीय परिसंवादात ११ देशातील ४६ तज्ञ १२ सत्रांमध्ये सहभागी होणार.

पुणे, फेब्रुवारी २३, २०२४: पुणे इंटरनॅशनल सेंटर आणि भारतीय परराष्ट्र मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने आठव्या आंतरराष्ट्रीय एशिया इकॉनॉमिक डायलॉग चे फेब्रुवारी २९ (गुरुवार) पासून मार्च २ (शनिवार) २०२४ पर्यंत पुण्यात आयोजन करण्यात आले आहे. ‘वाढत्या प्रवाहाच्या युगात भौगोलिक व आर्थिक आव्हाने’ या संकल्पनेवर केंद्रित एईडी 2024 मध्ये ११ देशांतील ४६ वक्ते तीन दिवसांच्या १२ सत्रांमध्ये सहभागी होतील.ही आंतरराष्ट्रीय परिषद आशिया आणि संपूर्ण जगाला भेडसावणाऱ्या आर्थिक बाबींवर अभ्यासपूर्ण चर्चा करेल. ही परिषद फक्त निमंत्रितांसाठी आहे. २९ फेब्रुवारी रोजी दुपारी चार वाजता उद्घाटन सत्रात प्रख्यात शास्त्रज्ञ व पीआयसी चे अध्यक्ष डॉ. रघुनाथ माशेलकर उपस्थितांचे स्वागत करतील .

‘दक्षिण आशियातील आर्थिक एकात्मतेला चालना देणे’ या विषयावरील उद्घाटन सत्राचे अध्यक्ष राजदूत गौतम बंबावाले असतील जे ह्या परिसंवादाचे संयोजक आहेत. ते पाकिस्तानमध्ये माजी भारतीय उच्चायुक्त आणि चीन आणि भूतानमधील माजी राजदूत म्हणुन सुद्धा कार्यरत होते. या सत्रातील पॅनेलमध्ये नामवंत राजदूतांचा समावेश आहे. बंबावाले यांच्यासह भारत सरकारचे परराष्ट्र सचिव विनय मोहन क्वात्रा; सेवा लमसाल, परराष्ट्र सचिव, नेपाळ; आणि राजदूत मसूद बिन मोमेन, परराष्ट्र सचिव, बांगलादेश, हे ही सहभागी होणार आहेत.

या सत्राचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे अँनिकेन हुइटफेल्ड, माजी परराष्ट्र मंत्री, किंगडम ऑफ नॉर्वे, यांच्याशी विशेष संवाद (फायरसाइड चॅट ) आहे. निवृत्त राजदूत व भारताच्या माजी उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि पोर्तुगाल आणि थायलंडमधील भारताच्या माजी राजदूत लता रेड्डी ‘महिला आणि भू-अर्थशास्त्र’ या विषयावर संवाद साधणार आहेत.

या परिषदेत तीन दिवसात होणाऱ्या सत्रांमध्ये ‘महिला आणि जिओ-इकॉनॉमी (भू अर्थ शास्त्र)’; जनरेटिव्ह एआय आणि त्याचा संस्थांवर व समाजावर होणारा प्रभाव’; ‘माहिती तंत्रज्ञान आणि डिजिटल डिप्लोमसी मध्ये भारताची भुमिका’; ‘तिसरे जागतिकीकरण’; ‘वाहने व त्यांना भविष्यात लागणारे इंधन’; ‘ड्रोन्स: भविष्य क्रांतिकारक करेल?’; ‘भारत, आखाती देश आणि युरोप कॉरिडॉर नवा व्यापार मार्ग होईल का?’; ‘जागतिक व्यापार संघटनेची (डब्ल्यूटीओ ) पुनर्कल्पना व पुनरुज्जवन’; ‘उदयोन्मुख तंत्रज्ञान आपले भविष्य सुरक्षित करू शकेल का?’; आणि ‘दक्षिण आशियाच्या दिशेने प्रादेशिक जवळीकीचा विस्तार अधिक एकात्मिक करणे’, या विषयांवर चर्चा केली जाणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments