पुणे, दिनांक २३ जानेवारी २०२६: “उपासनेतून आचरणाकडे आणि आचरणातून समाजधर्माकडे जाण्याची गरज आहे. समाजधर्म जर एकत्वाचा संदेश देत असेल, तर राष्ट्रधर्म कर्तव्याचा संदेश देतो. आज उपासना धर्मापुरते मर्यादित राहिलेल्या लोकांना राष्ट्रधर्म शिकवण्याची आवश्यकता आहे,” असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय कार्यकारिणीचे सदस्य भैय्याजी जोशी यांनी व्यक्त केले. “मिर्झाराजेंना राष्ट्रधर्म उमजला नाही, मात्र छत्रपती शिवरायांना तो माहित होता, म्हणूनच स्वराज्य उभे राहिले,” असेही त्यांनी यावेळी नमूद केले.
सारसबागेतील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर येथे आयोजित ‘श्रीमंत पेशवे धार्मिक, आध्यात्मिक आणि सामाजिक पुरस्कार’ प्रदान कार्यक्रमात भैय्याजी जोशी बोलत होते. श्री देवदेवेश्वर संस्थानच्या वतीने महामहोपाध्याय आर. मणी द्राविडशास्त्री आणि डॉ. वेंपटी कुटुंबशास्त्री यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी मुख्य विश्वस्त रमेश भागवत, सुधीर पंडित, पुष्करसिंह पेशवा, जगन्नाथ लडकत उपस्थित होते.
भैय्याजी जोशी पुढे म्हणाले की, “समाजधर्माचे पालन केवळ मंदिरात राहून होणार नाही, तर त्यासाठी समाजात जाऊन अनुभूती घ्यावी लागेल. समाज हा एक ‘पुरुष’ असून आपण त्याचे घटक आहोत, या भावनेने कर्तव्यांचे पालन करणे म्हणजेच समाजधर्म होय. सर्वांमध्ये चैतन्य एकच असताना भेदभाव का?” असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
द्राविडशास्त्री म्हणाले, “देशात विद्वानांची कमतरता जाणवत असली, तरी परंपरा मात्र जागृत आहे. आज वेदशास्त्राच्या परंपरेत नवयुवक सहभागी होत आहेत, ही समाधानकारक बाब आहे. कोणतीही विद्या टिकण्यासाठी समाजाचा पाठिंबा गरजेचा असतो. त्यासाठी विद्येच्या महत्त्वाबाबत समाजात जागृती निर्माण करणे आवश्यक आहे.”
कुटुंबशास्त्री म्हणाले की, “एक हजार वर्षांच्या गुलामगिरीतून भारताला मुक्त करणाऱ्या छत्रपती शिवरायांचा पदस्पर्श या पुण्यभूमीला लाभला आहे. काशीप्रमाणेच पुणे देखील विद्येची नगरी आहे. येथे ५३ हून अधिक संस्कृत संस्था कार्यरत आहेत. आपल्या विद्येतून समाजाची पूजा व्हायला हवी.”
यावेळी दंडक्रम पारायण पूर्ण करणारे देवव्रत रेखे आणि त्यांचे वडील महेश रेखे यांचा विशेष सन्मान करण्यात आला. प्रमुख विश्वस्त रमेश भागवत यांनी प्रास्ताविक केले, आदिती अत्रे यांनी सूत्रसंचालन केले आणि सुधीर पंडित यांनी आभार मानले.
—————-


