नागपुर, 17 मार्च : सामाजिक समरसता हा संघाच्या रणनीतीचा भाग नसून, निष्ठेचा विषय आहे. सामाजिक परिवर्तन सज्जनशक्तीच्या एकत्रीकरणातून व सामूहिक प्रयत्नातून होईल. संपूर्ण समाजाला जोडून सामाजिक परिवर्तनाच्या दिशेने समोर जाण्याचा संघाचा संकल्प आहे, अशी माहिती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह श्री. दत्तात्रेय जी होसबाळे यांनी आज अखिल भारतीय प्रतिनिधी सभास्थळी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये दिली. रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या ऐतिहासिक घटनेतून समाजाच्या सक्रिय भागीदारीचा अनुभव सर्वांनी घेतला, असे श्री. होसबाळे यांनी यावेळी जोर देऊन सांगितले.
उल्लेखनीय बाब म्हणजे नागपूरमध्ये सुरू असलेल्या तीन दिवसीय अखिल भारतीय वार्षिक प्रतिनिधी सभेच्या बैठकीमध्ये विद्यमान सरकार्यवाह मा. दत्तात्रेय जी होसबाळे यांची या पदावर फेरनिवड झाली. आज प्रतिनिधी सभेच्या महर्षी दयानंद सरस्वती परिसरामध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये अखिल भारतीय प्रचार प्रमुख श्री. सुनील जी आंबेकर यांनी दत्तात्रेय जी होसबाळे यांची निवड झाल्याची माहिती देऊन, त्यांचे अभिनंदन केले. संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेच्या बैठकीमध्ये सर्व संमतीने श्री. दत्तात्रेय जी होसबाळे यांची 2024 ते 2027 या तीन वर्षांकरिता सरकार्यवाह या पदावर निवड करण्यात आली.
एका प्रश्नाचे उत्तर देताना श्री. होसबाळे म्हणाले की, निवडणूक ही देशाच्या लोकशाहीचा महोत्सव आहे. देशामध्ये लोकशाही आणि एकतेला अधिक मजबूत करणे आणि प्रगतीची गती कायम ठेवणे आवश्यक आहे. संघाचे स्वयंसेवक 100 टक्के मतदानाकरिता समाजामध्ये जनजागरण करतील. समाजामध्ये या संदर्भात कोणतेही वैमनस्य, फुटीरता, वेगळेपणा किंवा एकतेविरुद्ध कोणतीही कृती होऊ नये, याबाबत समाजाने जागृत रहावे.
श्री. होसबाळे पुढे म्हणाले की, संघाचे कार्य हे देशव्यापी राष्ट्रीय अभियान आहे. आम्ही सर्व एका समाजाचे व एका राष्ट्राचे लोक आहोत. येणाऱ्या 2025 च्या विजयादशमीपर्यंत सर्व नगर, सर्व खंड म्हणजे तालुके तसेच सर्व मंडल स्थानी दैनिक शाखा तसेच साप्ताहिक मिलनाचे लक्ष्य पूर्ण होईल. संघाच्या कार्याचा प्रभाव आज समाजामध्ये दिसत आहे. संघाबाबत समाजाच्या मनामध्ये जी आत्मीयतेची भावना आहे, त्याबद्दल समाजाप्रती धन्यता व कृतज्ञतेचा भाव आमच्या मनात आहे. ते परखडपणे म्हणाले की, संपूर्ण समाज संघटित व्हावा हेच संघाचे स्वप्न आहे. पर्यावरणाचे रक्षण आणि सामाजिक समरसता हे कोणत्याही एका संघटनेचे नव्हे तर संपूर्ण समाजाचे अभियान आहे. देशामध्ये अनेक छोट्या गावांमध्ये श्रेष्ठ-कनिष्ठ असा भाव व अस्पृश्यता दिसून येते. शहरांमध्ये याचा प्रभाव अतिशय कमी आहे. गावातील तलाव, मंदिर आणि स्मशान याबद्दल समाजामध्ये कोणताही भेदभाव नसावा.
एका अन्य प्रश्नाच्या उत्तरामध्ये श्री. होसबाळे म्हणाले की, संदेशखाली प्रकरणातील अपराध्यांना कठोर शिक्षा मिळावी, यासाठी पीडित महिलांच्या प्रतिनिधी मंडळाने महामहिम राष्ट्रपतींना निवेदन दिले आहे. संघाचे स्वयंसेवक व संघ प्रेरित संघटना प्रत्येक स्तरावर सक्रिय रूपाने त्यांच्यासोबत उभ्या आहेत.
अल्पसंख्यकतेच्या मुद्द्यावर सरकार्यवाह म्हणाले की, आम्ही अल्पसंख्यकवादावर आधारित राजकारणाचा विरोध करतो. श्री गुरुजींच्या काळापासून आजपर्यंतच्या सर्व सरसंघचालकांनी इसाई आणि मुस्लिम नेत्यांशी संवाद करून समन्वय प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केलेला आहे.
मागील काही दिवसांमध्ये मणिपूरमध्ये जे सामाजिक संघर्ष झाले, ते अत्यंत पीडादायक आहेत. हे घाव अतिशय खोलवर आहेत. कुकी आणि मैतेयी या दोन्ही समाजामध्ये संघाचे काम असल्यामुळे आम्ही दोन्ही समाजाच्या नेत्यांशी संवाद साधून परिस्थिती सामान्य करण्यासाठी प्रयत्न केले, ज्यात आपल्याला यशसुद्धा मिळाले.
सहा सहसरकार्यवाहांची नियुक्ती
नागपूर, 17 मार्च
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नवीन कार्यकारिणीत मा. सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे यांनी 2024-27 या कार्यकाळाकरिता सहा सहसरकार्यवाहांची नियुक्ती केली.
1. श्री कृष्ण गोपाल जी
2. श्री मुकुंद जी
3. श्री अरुण कुमार जी
4. श्री रामदत्त चक्रधर जी
5. श्री अतुल लिमये जी
6. श्री आलोक कुमार जी


