*‘
पुणे, दि. १८: मृद व जलसंधारण विभागाच्यावतीने १५ ते २१ ऑगस्ट २०२६ या कालावधीत आयोजित जलसंधारण सप्ताह दरम्यान पुणे प्रादेशिक विभागात पुणे, सातारा, सोलापूर, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात ‘रील फॉर सॉईल ॲण्ड वॉटर कन्झर्वेशन रील्स स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे; स्पर्धेत युवक-युवतींनी उत्स्फूर्तपणे सहभागी घ्यावा, असे आवाहन मृद व जलसंधारण विभागाच्या पुणे प्रादेशिक विभागाचे अधीक्षक अभियंता चेतन कलशेट्टी यांनी केले आहे.
माजी मुख्यमंत्री दिवंगत सुधाकरराव नाईक यांच्या जयंती निमित्त २१ ऑगस्ट रोजी राज्यभर जलसंधारण दिन साजरा करण्यात येणार आहे. या निमित्ताने राज्यव्यापी ‘महा वॉकेथॉन-वॉक फॉर वॉटर, जलसंधारणाची शपथ, जलसंधारण सप्ताह, जलसंधारण अभियान आदी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. जलसंधारण सप्ताहादरम्यान सर्व जिल्ह्यात मृद व जलसंवर्धन रील्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
रील स्पर्धा जिल्हास्तरावर आयोजित करण्यात आली असून या स्पर्धेचा पात्र वयोगट १५ ते ३० वर्षे असा ठेवण्यात आला आहे. प्रत्येक स्पर्धकाने ३० ते ६० सेकंदांची इन्स्टाग्राम रील तयार करावी. व्हिडीओ किंवा रीलच्या सुरुवातीला व्हिडीओ, रीलचा उद्देश, स्वतःचे संपूर्ण नाव, जिल्ह्याचे नाव नमूद करणे आवश्यक आहे. स्पर्धकाने रील स्वतःच्या ‘पब्लिक इन्स्टाग्राम अकाऊंट’वर पोस्ट करण्यासह मृद व जलसंधारण विभागाच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटला टॅग करणे बंधनकारक राहील. पोस्टसाठी अधिकृत हॅशटॅग #SaveSoilSaveWater वापरणे अनिवार्य राहणार आहे.
*रील्स बनवण्यासाठी विषय*
रील्स बनवण्यासाठी माती संवर्धन, पाणी बचत, मृदसंधारण, जलसंधारण, मातीची धूप रोखणे, पावसाच्या पाण्याचे संकलन, शेततळे, बंधारे, पाणलोट क्षेत्र विकास, वृक्षारोपण, पर्यावरण संरक्षण, गावातील यशस्वी मृद व जलसंधारण कामे, पारंपरिक मृद व जलसंधारण पद्धती, माती व पाणी वाचविण्याच्या नाविन्यपूर्ण कल्पना, आजचे संवर्धन उद्याचे सुरक्षित भविष्य असे विविध विषय देण्यात आले आहेत.
रील्सचे गुणांकन विषय व संदेश – ३० गुण, कल्पकता -२५ गुण, प्रभावी सामाजिक संदेश – २० गुण, सादरीकरण व तांत्रिक गुणवत्ता – १५ गुण, इन्स्टाग्राम एंगेजमेंट – १० गुण असे एकूण – १०० गुणांच्या आधारे करण्यात येणार आहे. केवळ ‘लाईक्स’ किंवा ‘फॉलोवर्स’ वर विजेता निश्चित न करता तज्ज्ञ परीक्षण आणि सोशल मीडिया एंगेजमेंट या दोन्हींचा समतोल ठेवण्यात येणार आहे. गुणांकानुसार विजेत्याची निवड करण्यात येईल.
*विजेत्यांना बक्षीस*
प्रत्येक जिल्ह्यातून किमान २५० रिल्स आणि राज्यभरातून १० हजार रिल्सचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या माध्यमातून लाखो नागरिकांपर्यंत डिजिटल स्वरूपात मृद व जलसंधारणाचा संदेश पोहोचविण्याचा प्रयत्न आहे. रील स्पर्धेत प्रत्येक जिल्ह्यात प्रथम पुरस्कार २५ हजार रुपये व गौरवचिन्ह, द्वितीय पुरस्कार १५ हजार रुपये व गौरवचिन्ह आणि तृतीय पुरस्कार १० हजार रुपये व गौरवचिन्ह प्रस्तावित आहे. पात्र सहभागींना ई-प्रमाणपत्र तसेच विजेत्यांना विशेष ‘युवा मृद-जलदूत’ म्हणून गौरविण्यात येणार आहे, अशी माहितीदेखील श्री.कलशेट्टी यांनी दिली आहे.
0000


