*
*१२३ बहुजन विद्यार्थ्यांचे दैदिप्यमान यश; राज्य कर निरीक्षक पदाच्या ३५ टक्के जागांवर ‘महाज्योती’चे विद्यार्थी*
पुणे, दि. १८ : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत अराजपत्रित गट-ब दुय्यम सेवा २०२५ अंतर्गत घेण्यात आलेल्या राज्य कर निरीक्षक आणि दुय्यम निबंधक मुख्य परीक्षेच्या निकालात महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती), नागपूरच्या १२३ बहुजन विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे.
राज्य कर निरीक्षक पदाच्या एकूण २८० जागांपैकी १०१ जागांवर ‘महाज्योती’चे विद्यार्थी यशस्वी झाले असून, एकूण यशस्वी उमेदवारांमध्ये त्यांचा वाटा ३५ टक्के आहे. तर दुय्यम निबंधक पदाच्या ८४ जागांपैकी २२ विद्यार्थी ‘महाज्योती’चे आहेत. या पदातील यशस्वी उमेदवारांमध्ये संस्थेच्या विद्यार्थ्यांचा वाटा २५ टक्के आहे.
बहुजन विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांसाठी दर्जेदार प्रशिक्षण, सक्षम मार्गदर्शन आणि आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या संस्थेच्या प्रयत्नांचे हे यश आहे. दोन्ही पदांमध्ये मिळून १२३ विद्यार्थ्यांनी मिळविलेले यश संस्थेच्या प्रशिक्षण व मार्गदर्शनाची प्रभावीता अधोरेखित करणारे आहे. पोलिस उपनिरीक्षक पदासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर त्यातही ‘महाज्योती’चे विद्यार्थी मोठ्या संख्येने यशस्वी होतील, असा विश्वास ‘महाज्योती’चे व्यवस्थापकीय संचालक मिलिंद नारिंगे यांनी व्यक्त केला.
राज्य शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत कार्यरत असलेली ‘महाज्योती’ ही स्वायत्त संस्था गेल्या सात वर्षांपासून बहुजन विद्यार्थ्यांना दर्जेदार प्रशिक्षण, मार्गदर्शन आणि आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देत आहे. या प्रयत्नांमुळे स्पर्धा परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांच्या यशाची व्याप्ती वाढत असून, प्रशासनातील विविध सेवांमध्ये बहुजन तरुणांचा सहभागही वाढत आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या २०२४ मधील अराजपत्रित परीक्षेच्या जानेवारीत जाहीर झालेल्या अंतिम निकालातही ‘महाज्योती’च्या १५० विद्यार्थ्यांनी यश मिळविले आहे, असे प्रकल्प संचालक विकास गडपायले यांनी कळविले आहे.
*प्रशासनात बहुजन तरुणांचा वाढता सहभाग अभिमानास्पद : अतुल सावे*
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या गट-ब परीक्षेत ‘महाज्योती’च्या १२३ विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास, अपारंपारिक ऊर्जा व दिव्यांग कल्याण मंत्री तथा ‘महाज्योती’चे अध्यक्ष अतुल सावे यांनी आनंद व्यक्त केला. बहुजन समाजातील गुणवंत तरुणांना स्पर्धा परीक्षांसाठी योग्य मार्गदर्शन आणि संधी उपलब्ध करून देणे हे ‘महाज्योती’चे मूळ उद्दिष्ट आहे. राज्य कर निरीक्षक पदाच्या ३५ टक्के जागांवर संस्थेच्या विद्यार्थ्यांनी मिळविलेले यश हे राज्य शासनाच्या कल्याणकारी धोरणांची आणि संस्थेच्या प्रभावी मार्गदर्शनाची पावती असल्याचे त्यांनी सांगितले.
ग्रामीण व सर्वसामान्य पार्श्वभूमीतून आलेल्या विद्यार्थ्यांचे हे यश संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब आहे. भविष्यातही एकाही बहुजन विद्यार्थ्याचे स्वप्न आर्थिक किंवा इतर अडचणींमुळे अपूर्ण राहू नये, यासाठी शासन आणि ‘महाज्योती’ संस्था पूर्ण ताकदीने विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभी राहील, असे अतुल सावे यांनी सांगितले. यशस्वी सर्व विद्यार्थ्यांचे त्यांनी अभिनंदन करून पुढील प्रशासकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
०००


