Sunday, September 6, 2026
Google search engine
HomeUncategorizedआठवण, साठवण’ पुस्तकातून* *संघ जगून दाखवणाऱ्यांची ओळख* ...

आठवण, साठवण’ पुस्तकातून* *संघ जगून दाखवणाऱ्यांची ओळख* *अतुल लिमये यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन*

 

 

*पुणे* – व्यक्तीचित्रण हा लोभसवाणा साहित्यप्रकार आहे. मराठी साहित्यामध्येही या साहित्यप्रकाराला मोठी परंपरा लाभलेली आहे. श्री. तात्या जोगळेकर यांनी लिहिलेल्या ‘आठवण, साठवण’ या व्यक्तिचित्रणात्मक पुस्तकातून संघमूल्य जगून दाखवणाऱ्या अनेक कार्यकर्त्यांची ओळख होते, असे मनोगत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सह सरकार्यवाह अतुल लिमये यांनी व्यक्त केले.

 

संघाचे ज्येष्ठ प्रचारक उदय तथा तात्या जोगळेकर यांनी लिहिलेल्या ‘आठवण व्यक्तींची, साठवण प्रसंगांची’ या पुस्तकाचे प्रकाशन लिमये यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमात ते बोलत होते. ‘कौशिक आश्रम’तर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रीय तपास यंत्रणेचे (एनआयए) निवृत्त विशेष पोलीस महासंचालक अतुलचंद्र कुलकर्णी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते. संघाच्या पश्चिम क्षेत्राचे प्रचार प्रमुख प्रमोद बापट यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

 

“संघाचा प्रचारक समाजात राहून काम करत असल्यामुळे सर्वच प्रकारची माणसे त्याला भेटत असतात. या सर्वांचे अनुभव तो प्रचारक म्हणून घेत असतो. संघकार्य हे खूप विलक्षण कार्य असल्याने समाजाशी संघप्रचारकाचे नाते जडते. संघकार्य हे पारिवारिक कार्य असल्याचा अनुभव त्याला येतो,” असे लिमये म्हणाले.

 

“संघकार्यकर्ता लिहितो, तेव्हा त्याच्या व्यक्तिचित्रणाला त्याच्या ध्येयनिष्ठ जीवनाचाही स्पर्श होतो. तात्या जोगळेकर यांच्या लेखनातील हा धागा पुस्तक वाचताना मनाला निश्चितच भावतो,” असेही लिमये यांनी सांगितले.

 

‘आठवण, साठवण’ या पुस्तकातून संघ कशा पद्धतीने काम करतो, संघ कशा पद्धतीने कार्यकर्ते घडवतो, याची ओळख होतेच. त्या बरोबरच या पुस्तकाच्या वाचनातून पुढची दिशाही आपल्याला मिळते. या पुस्तकातील सर्व व्यक्तिचित्रणे वाचल्यानंतर संघाचे एक छान मोठे चित्र तयार होते. संघाचे प्रतिबिंब समजून येते. या पुस्तकाच्या वाचनातून संघाच्या पुनःप्रत्ययाचा आनंद मिळाला, असे मनोगत अतुलचंद्र कुलकर्णी यांनी व्यक्त केले.

 

तात्या जोगळेकर यांनी केलेले व्यक्तिचित्रण तसेच प्रसंग चित्रण मनाला जसे भावते, तसेच हे पुस्तक वाचून झाल्यानंतरही ही व्यक्तिमत्व आपल्याशी संवाद साधत राहतात, असे बापट म्हणाले. अदिती हर्डीकर यांनी कौटुंबिक प्रसंग सांगून तात्यांच्या सहवासामुळे अनेक चांगले संस्कार झाल्याचे सांगितले. ज्येष्ठ पत्रकार सुधीर जोगळेकर यांनी आभारप्रदर्शन केले.

—-

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments