Monday, September 14, 2026
Google search engine
HomeUncategorizedउत्कृष्ट महानगरपालिका अधिकारी:विजय लोखंडे

उत्कृष्ट महानगरपालिका अधिकारी:विजय लोखंडे

एखाद्या अधिकाऱ्याने,केवळ पाट्या टाकायचे काम न करता मनापासून आपली कर्तव्ये आणि सेवा बजावली तर त्याला मिळणारा आनंद,लोकांच्या मनात त्याच्यासाठी निर्माण होणारी जागा ही खऱ्या लोक सेवकाची गुण वैशिष्ट्ये असतात.असेच एक आदर्श अधिकारी म्हणजे
सोलापूर महानगर पालिकेत सध्या विभागीय अधिकारी म्हणून कार्यरत असलेले श्री
विजय लोखंडे हे होत.

तसे पाहिले तर श्री लोखंडे यांना लोक सेवेचा वारसा घरातूनच मिळाला आहे . त्यांचे वडील कै सूर्यकांत बापूजी लोखंडे हे महाराष्ट्र शासनाच्या महसूल खात्यात होते. पुढे ते तहसीलदार पदापर्यंत पोहोचले आणि त्याच पदावरून निवृत्त झाले.
पण त्यांची इतकीच ओळख नव्हती तर ते जातील तिथे, येथील लोकांशी एक रूप होऊन त्यांच्या समस्या आत्मीयतेने सोडविण्यासाठी प्रयत्नशील असत. त्यामुळे जिथे जिथे त्यांनी सेवा बजावली,तिथे तिथे त्यांना लोकांचे अफाट प्रेम मिळाले.
त्यांना अन्न धान्य पुरवठा विभाग ,करमणूक विभाग यांची आणि महत्वाचे म्हणजे कुळ कायद्याची उत्तम जाण असल्याने त्यांनी शासनाचा महसूल वाढविण्याचे काम विलक्षण गतीने पूर्ण केले.

वडीलांच्या लोक सेवेचा वारसा आपण चालवायचा याचा निश्चय करून विजय
यांनी स्थापत्य अभियांत्रिकी तील पदविका प्राप्त केल्यानंतर स्वतःचा बांधकाम व्यवसाय सुरू करण्याचा किंवा मुंबई/ पुणे किंवा परदेश गाठून तिकडे नोकरी करण्याचा पर्याय न निवडता ते सोलापूर महानगरपालिकेत कनिष्ठ अभियंता पदी रुजू झाले आणि त्यांची महानगर पालिकेतील सेवा सुरू झाली.

आपले काम तडफदार, लोकाभिमुख राहून सुरुवात करीत आल्याने श्री विजय लोखंडे हे प्रशासन आणि नागरिक अशा सर्वामध्ये लोकप्रिय रहात आले आहेत. वेळोवेळी पदोन्नती मिळून आता ते विभागीय अधिकारी म्हणून कामकाज करीत आहेत .

श्री विजय लोखंडे यांनी केवळ चाकोरीबद्ध काम न करता नव्या नव्या संकल्पना प्रत्यक्षात साकार करण्यावर सतत भर दिला.यासाठी ते नेहमी वरिष्ठ आणि त्याच बरोबर कनिष्ठ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना विश्वासात घेत आले आहेत. त्यामुळे ते त्यांच्या संकल्पना प्रत्यक्षात यशस्वीपणे अंमलात आणू शकले.

श्री विजय लोखंडे यांनी त्यांच्या नेतृत्वाखाली नेत्रदीपक अशी कार्यालय सुधारणा आणि सुशोभीकरण केले.यात अंतर्गत स्वच्छ्ता , त्यासाठी केलेला एस ओ पी , नेटके फर्निचर आणि नेट सारख्या सर्व सोयी प्रत्येकाच्या
टेबलपर्यंत पोहचविण्यासाठी अथक परिश्रम याचा समावेश आहे.

तसेच मनपात तेच ते, एकाच प्रकारचे काम करून
कंटाळलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या मनाची स्वच्छ्ता महत्वाचे आहे,हे ओळखून त्यांच्या मनातील जळमटे काढणे आणि आपण इथे का व कशासाठी काम करतो याची जाणीव निर्माण होऊन ते सेवाभावी वृत्तीने काम करायला लागतील यासाठी सर्वांची मने बदलण्यासाठी ते जाणीवपूर्वक प्रयत्न करीत असतात. आपल्या अधिंनस्त असलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या मनातील मरगळ दूर करून सगळ्यांनी उत्साहाने कामास लागावे हा दृष्टीकोन समोर ठेवून त्यांनी प्रथम विभागीय कार्यालय चांगले करून घेतले. यासाठी त्यांचे “अभियंता कौशल्य ” त्यांनी पणाला लावले . केवळ “कार्यालयीन वेळेतच कार्यालयाचे काम ” असा संकुचित विचार न करता ते स्वतःचा खासगी वेळ कार्यालयीन वेळेनंतरही कार्यालयासाठी देत असतात. त्यांनी कार्यालयातील तीस पस्तीस वर्षांपूर्वीपासून असलेली घाण काढून कार्यालयाची स्वच्छ्ता
करून घेतली. कार्यालय केवळ स्वच्छ, नीट निटके करून न थांबता त्यांनी स्वतः बाजार पेठेत जाऊन ,काही मोठ्या शो रूम हुडकून चांगले साहित्य माफक दरात मिळवून ही कामे स्वस्तात कशी होतील, हे पाहिले.कौतुकाची बाब म्हणजे आर्किटेक्ट होऊन इंटिरियर डेकोरेटर म्हणून पुण्यात स्वतःचा उत्तम व्यवसाय करणाऱ्या त्यांच्या मुलीने, गौरीने वडिलांच्या कार्यालयाचे सुशोभीकरण म्हणजे जणू आपल्या घरचेच कार्य आहे, असे समजून एक पैसाही न घेता,स्वतःच्या कल्पनेतून आराखडा निश्चित करून त्याची स्वतःच्या देखरेखीखाली चांगली अंमलबजावणी केली. त्यामुळे आता या कार्यालयाला उत्कृष्ट असा “कॉर्पोरेट लूक” मिळाला आहे.

तसेच आता प्रत्येक कर्मचाऱ्याच्या डोक्यावर पंखा आहे. प्रत्येकास स्वतंत्र नेट कनेक्शन , चार्जिंग पॉइंट इतक्या बारीक सारीक बाबीत लक्ष देवून वडिलांना कार्यालयाच्या सुशोभीकरतात हातभार लावला.त्यामुळे एका वर्षांपूर्वी जर कुणी या कार्यालयात गेले असतील आणि आता गेले तर कार्यालयाचा झालेला कायापालट पाहून ते चकितच होतात.याचेच फलित म्हणजे अलीकडील काळात
महानगर पालिकेने हाती घेतलेल्या विशेष स्वच्छ्ता मोहीम स्पर्धेमध्ये श्री विजय लोखंडे यांच्या विभागीय कार्यालयाने सर्व विभागीय कार्यालयांमध्ये तिसरा क्रमांक पटकावला.याबद्दल महापालिका आयुक्तांच्या हस्ते
नुकतेच त्यांना स्मृतिचिन्ह आणि प्रशस्ती पत्र प्रदान करून गौरविण्यात आले .

विशेष म्हणजे श्री लोखंडे यांच्या लोकाभिमुख सेवा बजावण्याच्या उपक्रमात पत्नी सौ राखी हीची देखील मोठी साथ आहे,कामामुळे घरी यायला उशीर झाल्यास,सुट्टी च्या दिवशीही कार्यालयात जावे लागल्यास ती कधीही कुरबुर करीत नाही, उलट माझ्या सर्व उपक्रमास तिचा पाठिंबाच असतो,त्यामुळे काम करायला अधिक हुरूप येतो,असे श्री विजय लोखंडे अभिमानाने सांगतात.

श्री विजय लोखंडे यांच्या यशाचे रहस्य म्हणजे ते,केवळ कार्यालयात बसून तथाकथित “साहेबकी” न करता वेळ प्रसंगी स्वतः रस्त्यावर उतरतात. भर उन्हात ते कनिष्ठ अधिकारी,कर्मचारी यांच्या सोबत मिळून मिसळून काम करतात, हे होय.
त्यांच्या कार्य शैलीची काही उदाहरणे द्यावयाची झाल्यास,
ती पुढील प्रमाणे देता येतील.

१) विभागीय अधिकारी म्हणून
विभागीय कार्यालय क्रं ६ येथे
कार्यरत असताना कार्य क्षेत्रातील दाट झोपडपट्टीत राहणाऱ्या नागरिकांसाठी नागरी सुविधा पुरविणे , सांडपाणी व्यवस्थापन ,पाणी पुरवठा आणि रस्ते विकास ही सर्व कामे गुणवत्तापूर्ण व्हावीत म्हणून उन्हातान्हाची पर्वा न करता स्वतः उभे राहून म्हणून
देखरेख करून पूर्ण करून घेतली.याबद्दल त्यांचा तत्कालीन पालकमंत्री
श्री विजयकुमार देखमुख यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला .
२)
एका सामाजिक संस्थेकडून गेल्या नवरात्रात तुळजापूर कडे पायी जाणाऱ्या भाविकांना अन्न प्रसाद वाटप
करण्यात येत होते. त्यावेळी अधिकारीपणाची झुल उतरवून एखाद्या सामान्य भाविक कार्यकर्त्याप्रमाणे त्यांनी अत्यंत आवडीने सेवा बजावली. विशेष म्हणजे तो त्यांच्या सुट्टीचा दिवस होता.

श्री विजय लोखंडे यांच्या कार्याबद्दल तत्कालीन महानगर पालिका आयुक्त
श्री दीपक तावरे यांचे कडून सत्कार २०१९ साली त्यांचा सत्कार करण्यात आला.तसेच इतर काही वेळा नागरिकांनी देखील त्यांचा उस्फुर्त सत्कार केला आहे.

श्री विजय लोखंडे यांच्या सारखाच दृष्टिकोन आणि कार्यशैली सर्व महानगर पालिका,नगरपालिका,जिल्हा परिषदा यांच्यातील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी ठेवली तर आपली सर्वच शहरे स्वच्छ व सुंदर दिसतील. अन्यथा केवळ आदेशांचे पालन म्हणून तात्पुरती स्वच्छता मोहिम राबविल्यास, मोहीम संपली की शहरे आणि गावे पुन्हा बकाल दिसायला लागतात,हे आपण पाहतोच.

श्री विजय लोखंडे यांच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.
लेखन: देवेंद्र भुजबळ
-986948480

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments