पुणे : मणिपूर मधील हिंसाचारामुळे सुमारे साठ हजार नागरिक तात्पुरत्या निवारा केंद्रामध्ये राहत आहेत. त्यांना सहकार्य करण्याच्या भावनेतून पुण्यातील ३५ पेक्षा अधिक गणेशोत्सव मंडळे एकत्र येऊन, काही सामाजिक संस्था व व्यक्ती यांच्या सहकार्याने ५ हजार ब्लँकेट्स आणि जेवणाच्या भांड्यांचे ५ हजार संच देणार आहेत.हे साहित्य प्रदान करण्याचा कार्यक्रम पुणे परिवार संस्थेच्या वतीने दिनांक १५ जानेवारी रोजी सायंकाळी ५.३० वाजता टिळक रस्त्यावरील मराठा चेंबर ऑफ कॉमर्स येथे होणार आहे.
यावेळी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, खासदार मेधा कुलकर्णी, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, आमदार हेमंत रासने, ज्येष्ठ पत्रकार विजय कुवळेकर उपस्थित राहणार आहेत. खास मणिपूरहून हे साहित्य स्वीकारण्यासाठी मणिपूरचे नगरविकास व ग्रामीण विकास मंत्री युमनाम खेमचंद सिंग, पुनर्वसन मंडळाचे प्रमुख आमदार थौनाओजम श्यामकुमार, राजेश साहनी हे उपस्थित राहणार आहेत.
पुणे परिवारसह विविध गणेशोत्सव मंडळे आणि संस्था यांच्या सहकार्याने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मणिपूर मधील हिंसाचारामध्ये अनेक नागरिक अडकले आहेत. हजारो लोक विस्थापित झाले असून आजही तणावाची परिस्थिती कायम आहे. त्यामुळे तेथील नागरिक आपले बांधव आहेत ही भावना बाळगत पुण्यातील गणेशोत्सव मंडळाच्या वतीने मदतीसाठी पुढाकार घेण्यात आला आहे.
अधिक माहितीसाठी मो. 9823037299


