पुणे : पुण्याचे अनुकरण सगळीकडे केले जाते त्यामुळे पुण्यातील तरुणाई
संस्कृतीविषयी एकनिष्ठ राहिली तर देश तुमच्याकडे पाहील आणि तुमचे अनुकरण करेल. त्यामुळे शहरात ड्रग्स अजिबात नकोत. धूम्रपान, मादक पदार्थांचे सेवन करणे ‘कूल’ नाही. ही भावना मनात रुजवा. याचे ब्रँडिंग ढोल-ताशाच्या माध्यमातून करा, असे आवाहन परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त कृषिकेश रावले यांनी केले.
नू.म.वि. वाद्यपथक ट्रस्टतर्फे शनिवार पेठेतील विष्णूकृपा मंगल कार्यालय येथे पुणे शहरातील सर्व ढोल ताशा पथकातल्या भगिनींसोबत कृतज्ञेचा रक्षाबंधन सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी अमली पदार्थ विरोधी जनजागृती करण्यात आली. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट चे अध्यक्ष सुनील रासने, अखिल मंडई मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात, निवृत्त सेनाधिकारी बजरंग निंबाळकर, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टचे उत्सव प्रमुख पुनीत बालन, नू.म.वि. वाद्यपथकाचे अध्यक्ष यज्ञेश मुंडलिक यावेळी उपस्थित होते.
कृषिकेश रावले म्हणाले, महिला आपली संस्कृती पुढे घेऊन जातात. कुठलाही उपक्रम यशस्वी करायचा असेल, तर महिलांचा सहभाग अनिवार्य आहे. मुलींनी अमली पदार्थ विरोधी जनजागृती मोहिमेत सहभाग घेतला पाहिजे. तणाव हे कारण देऊन धूम्रपान केले जाते, पण हे चुकीचे आहे. कमजोरी आकर्षक नाही, फक्त सामर्थ्य आणि ताकदच खऱ्या अर्थाने आकर्षक आहे.
अण्णा थोरात म्हणाले, वाद्य पथकातील मुला-मुलींनी मोठ्या उत्साहात रक्षाबंधन साजरे केले. या सणाचे पावित्र्य जपत, मुलांनी मुलींचे रक्षण करण्याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे. रक्षाबंधन ही फक्त राखी बांधण्याची प्रथा नसून, परस्पर आदर, जिव्हाळा आणि सुरक्षिततेचे प्रतीक आहे. अशा उपक्रमांमुळे तरुणाईमध्ये एकोपा, संस्कार आणि बांधिलकीची भावना दृढ होते.
पुनीत बालन म्हणाले, तरुणांनी मादक पदार्थांचे सेवन करु नका. मुलींची छेडछाड करु नका. आपली खरी नशा म्हणजे ढोल-ताशा आहे. गणेशोत्सवाला कोणतेही गालबोट लागणार नाही, याची प्रत्येकाने काळजी घ्या. आपण सर्वांनी मिळून सुरक्षित आणि शिस्तबद्ध गणेशोत्सव तसेच विसर्जन मिरवणूक पार पाडूया. आपली परंपरा, आपली संस्कृती आणि आपली सुरक्षितता हेच आपल्यासाठी महत्त्वाचे आहे.
यज्ञेश मुंडलिक म्हणाले, वाद्यपथकांविषयी अनेक समज गैरसमज आहेत परंतु गणेशोत्सवाला पारंपारिक साज चढवण्याचे काम वाद्यपथके करतात. यासोबतच अनेक सामाजिक उपक्रमांमध्ये वाद्यपथके वर्षभर कार्यरत असतात. वाद्यपथकातील तरुणाईची एकजूट ही समाजातील कोणत्याही अडचणीवर मात करण्यासाठी कायम तत्पर असते.


