Sunday, September 6, 2026
Google search engine
HomeUncategorizedदेशभक्तीचा उत्साह आणि स्वच्छतेचा संकल्प अनोखा संगम.... हर घर तिरंगा, हर...

देशभक्तीचा उत्साह आणि स्वच्छतेचा संकल्प अनोखा संगम…. हर घर तिरंगा, हर घर स्वच्छता अभियानांतर्गत पिंपरी चिंचवड महापालिकेकडून भव्य बाईक रॅलीचे आयोजन,स्वच्छतेची शपथ,झाडे लावण्याचाही सामुहिक संकल्प…

पिंपरी, १४ ऑगस्ट २०२५ : ‘भारत माता की जय’ , ‘वंदे मातरम’ अशा घोषणांनी दुमदुमलेला परिसर… हातामध्ये अभिमानाने फडकणारा तिरंगा… रस्त्यांवरून शिस्तबद्धपणे पुढे सरसावणारी भव्य बाईक रॅली… देशभक्तीचा उत्साह, स्वच्छतेचा संकल्प आणि पर्यावरणप्रेमाचा संदेश यांचा एकत्रित सोहळा आज पिंपरी चिंचवडमध्ये अनुभवायला मिळाला.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने ‘हर घर तिरंगा आणि हर घर स्वच्छता’ अभियानाच्या निमित्ताने आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह आणि अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, विजयकुमार खोराटे, तृप्ती सांडभोर यांच्या मार्गदर्शनाखाली आज भव्य बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. भक्तीशक्ती येथून सकाळी ७ वाजता सुरू झालेली ही रॅली महापालिका मुख्यालयापर्यंत देशभक्तीच्या वातावरणात आणि प्रचंड उत्साहात पार पडली.

या रॅलीत महापालिकेचे उपायुक्त अण्णा बोदडे, सचिन पवार, विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, सहाय्यक आरोग्य अधिकारी राजू साबळे, अंकुश झिटे, सुधीर वाघमारे, किशोर दरवडे, शांताराम माने, महेश आढाव, श्रीराम गायकवाड, उप अग्निशमन अधिकारी गौतम इंगवले, यमुनानगर ज्येष्ठ नागरिक संघाचे गजानन ढमाले , रवींद्र कुकडे यांच्यासह विविध भागातील ज्येष्ठ नागरिक, महापालिकेच्या अग्निशमक, आरोग्य, जनसंपर्क, स्थापत्य, विद्युत तसेच विविध विभागातील कर्मचारी यांसह मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते.

रॅलीदरम्यान ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम’ आणि ‘स्वच्छ भारत, सुंदर भारत’ अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. सहभागी नागरिकांनी ‘माझी वसुंधरा’ व स्वच्छतेची सामूहिक प्रतिज्ञा घेऊन पर्यावरण संवर्धन, प्लास्टिकमुक्त शहर आणि कचरा व्यवस्थापनाचे महत्त्व अधोरेखित केले.

रॅलीत सहभागी बाईकस्वारांनी तिरंग्यांनी सजवलेल्या वाहनांसह शिस्तबद्धपणे प्रवास करत नागरिकांना देशभक्तीचा आणि जबाबदार नागरिकत्वाचा संदेश दिला. या उपक्रमातून स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला देशभक्तीबरोबरच स्वच्छतेचे आणि पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व प्रभावीपणे जनमानसात रुजवण्यात आले.

तसेच महापालिकेच्या ‘हर घर तिरंगा, हर घर स्वच्छता’ या उपक्रमाचा उद्देश केवळ स्वातंत्र्य दिनाचा उत्सव साजरा करणे नसून, नागरिकांमध्ये स्वच्छतेची सवय आणि पर्यावरणपूरक जीवनशैली रुजवणे असल्याचे यावेळी आरोग्य विभाग प्रमुख उप आयुक्त सचिन पवार यांनी सांगितले तसेच या निमित्ताने शहरातील प्रत्येक घरावर तिरंगा फडकवण्याचे आणि परिसर स्वच्छ ठेवण्याचे आवाहन करण्यात आले. तर शहर स्वच्छ ठेवण्याबरोबरच पर्यावरण वृध्दीसाठी शहरात झाडे लावण्याचा सामुहिक संकल्पही करण्यात आला.

स्वच्छतेची सामुहिक शपथ

“आम्ही भारताचे सुजाण नागरिक शपथ घेतो की, आम्ही या भारत मातेला, या वसुंधरेला स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी प्रयत्न करू, या वसुंधरेला या पर्यावरणाला आमच्यापासून कोणतीही हानी होणार नाही याची दक्षता घेऊ. आम्ही या देशाला सुजलाम-सुफलाम करण्यासाठी कटीबध्द राहू व आमच्याकडून पर्यावरणाला त्रास होईल, असे कोणतेही काम आम्ही करणार नाही, जास्तीत जास्त झाडे लावून या देशाला या वसुंधरेला स्वच्छ, सुंदर, हरित आणि प्रदुषणमुक्त करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू”, अशी शपथ यावेळी उपस्थितांनी घेतली. शपथेचे वाचन प्रफुल्ल पुराणिक यांनी केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments