Sunday, August 30, 2026
Google search engine
HomeUncategorizedनाविन्यपूर्ण कौशल्यांचे सतत शिक्षण घ्यावे लागेल - एआयसीटीईचे अध्यक्ष प्रा. टी. जी....

नाविन्यपूर्ण कौशल्यांचे सतत शिक्षण घ्यावे लागेल – एआयसीटीईचे अध्यक्ष प्रा. टी. जी. सीताराम

 

 

डीईएस पुणे युनिव्हर्सिटीचा पहिला पदवी प्रदान समारंभ उत्साहात

 

पुणे – तंत्रज्ञान झपाट्याने बदलत असल्याने, आपल्याला सतत नवीन कौशल्ये आत्मसात करावे लागणार आहे. सर्व क्षेत्रांमध्ये कुत्रिम बुद्धीमत्तेचे आव्हान आपल्यासमोर आहे. मात्र, आपल्यासाठी ही संधी आहे. अशा परिस्थितीत नाविन्यतेची कास धरत आगामी काळात स्किलिंग, अपस्किलिंग आणि रीस्केलिंगवर भर द्यावा लागेल, असे मत अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेचे अध्यक्ष प्रा. टी. जी. सीताराम यांनी व्यक्त केले.

 

डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या डीईएस पुणे युनिव्हर्सिटीच्या पहिल्या पदवी प्रदान समारंभात प्रा. सीताराम बोलत होते. यावेळी विद्यापीठाचे अध्यक्ष डॉ. रविंद्र आचार्य, कुलगुरू डॉ. राजेश इंगळे, कुलसचिव डॉ. संजीवनी शेळके, परीक्षा संचालक डॉ. महेश गायकवाड उपस्थित होते. या समारंभात एकूण १८३ विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र देण्यात आली.

 

प्रा. सीताराम म्हणाले की, पदवी प्रदान समारंभ हा विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचा असतो. यानंतर विद्यार्थ्यांचा नवीन प्रवास सुरू होणार आहे. आज पदवी मिळवणारे विद्यार्थी हे पुढील पिढीसाठी आदर्श राहणार आहे. या नवीन प्रवासात भरपूर आव्हाने असतील आणि काही ठिकाणी अपयश येईल. मात्र, आत्मविश्वासाने मार्गक्रमण केल्यास, नक्की यशस्वी व्हाल. देशात राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० ची अंमलबजावणी सुरू असल्याने, विद्यार्थ्यांना बहुविद्याशाखीय शिक्षण घेण्याची संधी उपलब्ध झाली आहे. या धोरणानुसार विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी एन्ट्री आणि एक्झिटची सुविधा मिळत आहे. त्याचप्रमाणे आपण घेतलेल्या शिक्षणाचे क्रेडिट अॅकेडेमिक बँक ऑफ क्रेडिटमध्ये जमा होतात. या फायदा उच्चशिक्षणासाठी होत असून, ही फार मोठी उपलब्धी आहे. एआयसीटीईने विद्यार्थ्यांसाठी उच्चशिक्षण आणि संशोधनासाठी स्वयं प्लस, एज्युटेक कोर्स, आयडीया लॅब्सटी निर्मिती केली आहे.

 

डॉ. आचार्य म्हणाले की, डीईस पुणे युनिव्हर्सिटीचा पहिला पदवी प्रदान समारंभ असल्याने, विद्यार्थी, प्राध्यापक, पालकांसाठी हा आनंदाचा दिवस आहे. पदवीचे शिक्षण पूर्ण झाले असले, तरी आपल्याला पुढील जीवनातही विद्यार्थी बनून नवे तंत्रज्ञान आणि कौशल्यांना आत्मसात करावे लागेल. त्याचप्रमाणे नैतिकतेने सेवा करायची असून, आपल्या संस्कृतीशी जुळून राहायचे आहे. आपल्याला मिळालेले पदवी हे केवळ शिक्षण नसून, जबाबदारी आहे. या भावनेने समाजासासाठी काम करण्याची जाणीव ठेवा, असे डॉ. आचार्य यांनी सांगितले. डॉ. राजेश इंगळे यांनी विद्यापीठाचा आढावा सादर करीत, विद्यापीठातील विविध उपक्रमांची माहिती दिली. डॉ. गायकवाड यांनी आभार मानले.

 

….

 

चौकट

 

 

देशात शालेय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या सुमारे २६ कोटी आहे, तर उच्च शिक्षण घेणाऱ्यांची संख्या ४ कोटी आहे. हे विद्यार्थी १४०० विद्यापीठे आणि ४० हजार महाविद्यालयांमधून शिक्षण घेत आहे. सरकारकडून उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढविण्याचे प्रयत्न सुरू असून, त्यासाठी विविध सरकारी योजना आखण्यात येत आहे. या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी विद्यापीठांची संख्या आपल्याला दुप्पट करावी लागेल, अशी माहिती प्रा. टी. जी. सीताराम यांनी दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments