रसिकांनी अनुभवला ‘वंदे मातरम्’चा दीडशे वर्षांचा प्रवास
हिंदू महिला सभेच्या नवरात्र महोत्सवाच्या अमृत महोत्सवाची सांगता
पुणे, दि. ११ ऑक्टोबर, २०२५ – आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे… या तुकोबारायांच्या अभंगाची प्रचीती, ज्या उच्चारणात आहे, त्या वंदे मातरम् या राष्ट्रमंत्राची धगधगती गाथा रसिकांनी अनुभविली. वंदे मातरम् या राष्ट्रीय गीताचा जन्मापासूनचा प्रवास आणि आजवरचा दीडशे वर्षांचा इतिहास, श्रोत्यांसमोर आला.
निमित्त होते हिंदू महिला सभेच्या नवरात्र महोत्सवाच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या सांगतेचे. वंदे मातरम् या रचनेच्या निर्मितीला दीडशे वर्षे पूर्ण होत आहेत हेच औचित्य साधून सदाशिव पेठेतील भावे प्राथमिक शाळेच्या सभागृहात वंदे मातरम् १५० या अभिवाचनात्मक दृकश्राव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
ऐन ब्रिटिश कालखंडात डेप्युटी मॅजिस्ट्रेट, या पदावर कार्यरत असणाऱ्या बंकिमचंद्र चटोपाध्याय यांनी १८७५ च्या नोव्हेंबर महिन्यात, सर्वप्रथम वंदे मातरम् लिहिले. नंतर ते त्यांनी आनंदमठ कादंबरीत समाविष्ट केले. बंकिमचंद्र यांचे अकाली निधन झाले, मात्र त्यांच्या लेखणीतून उतरलेले वंदे मातरम् पुढील ७० पेक्षा अधिक वर्षे भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचा बीजमंत्र ठरले. वंदे मातरम् या शब्दांच्या केवळ उच्चारानेही मरगळलेल्या राष्ट्राला चेतना मिळाली. क्रांतिकारकांच्या सशस्त्र कृतींना याच मंत्राने प्रेरणा दिली आणि अहिंसेचे तत्त्व आचारणाऱ्या सत्याग्रहींनाही हाच मंत्र तारक ठरला. इतकेच नाही, तर लढ्याची पार्श्वभूमी नसलेल्या सर्वसामान्य जनतेलाही याच रचनेने लढण्याचे बळ दिले. हा सारा रोमांचक प्रवास या कार्यक्रमातून श्रोत्यांसमोर आला.
लेखक, संशोधक मिलिंद सबनीस, दिग्दर्शक प्रसाद कुलकर्णी, संगीतकार अजय पराड, अभिवाचक अभिषेक खेडकर, प्रदीप फाटक आणि अवंती लोहोकरे, तंत्रसाह्य सुरेंद्र गोखले यांच्या सहभागातून भारतीय स्वातंत्र्यलढ्याचा युद्धघोष असणाऱ्या या तेजस्वी काव्याचा अभिवाचनात्मक दृकश्राव्य प्रत्यय रसिकांची दाद मिळवणारा ठरला.
स्वागतरपर प्रास्ताविक करताना सभेच्या अध्यक्ष सुप्रिया दामले म्हणाल्या, ‘हिंदू महिला सभेची स्थापना स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या प्रेरणेने झाली. त्यांच्या तेजस्वी विचारांचे पाठबळ संस्थेच्या उपक्रमांमागे आहे. सावरकरांनी ज्या रचनेचा गौरव केला, त्या वंदे मातरम् रचनेचा संपूर्ण इतिहास सांगणारा हा कार्यक्रम अमृत महोत्सवाच्या सांगतेप्रसंगी औचित्यपूर्ण आहे’. सुरवातीला संस्थेच्या नवरात्र महोत्सवाची माहिती देणारी ध्वनिचित्रफीत दाखविण्यात आली. सुधा राजगुरू यांनी सूत्र
संचालन केले.


