Tuesday, August 25, 2026
Google search engine
HomeUncategorizedलोकमान्य नगरच्या एकात्मिक पुनर्विकासाला गती देण्यासाठी रहिवासी आक्रमक, मुंबई गाठत वरिष्ठ अधिकाऱ्यांना...

लोकमान्य नगरच्या एकात्मिक पुनर्विकासाला गती देण्यासाठी रहिवासी आक्रमक, मुंबई गाठत वरिष्ठ अधिकाऱ्यांना साकडे*

 

 

*मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात लोकमान्य नगर पुनर्विकासाचा प्रश्न, एकात्मिक पुनर्विकासाला गती देण्यासाठी नागरिकांचा आक्रमक पवित्रा*

 

पुणे/मुंबई – दि १३: १९६२ साली महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (म्हाडा) माध्यमातून उभारण्यात आलेल्या लोकमान्य नगरच्या पुनर्विकासाचा प्रश्न तापताना दिसत आहे. स्थानिक रहिवाशांच्या नोंदणीकृत लोकमान्य नगर रहिवासी संघाचा गेली अनेक वर्षांपासून एकात्मिक विकासासाठी (क्लस्टर डेव्हलपमेंट) आग्रह आहे. रहिवासी संघाच्या माध्यमातून मुंबईमध्ये म्हाडाचे सीईओ संजीव जयस्वाल आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनिल वानखेडे यांची भेट घेत एकात्मिक पुनर्विकासाच्या प्रक्रियेला गती देण्याची मागणी करण्यात आली. यावेळी संघाचे अध्यक्ष विनय देशमुख, सुनील शहा, विनायक देवळणकर, विजय चव्हाण, प्रशांत मोहोळकर आदी उपस्थित होते.

 

शहराच्या मध्यवस्तीत जवळपास साडेसोळा एकरावर असणाऱ्या इमारतींचा पुनर्विकास एकल पद्धतीने करायचा की एकात्मिकपणे? यावरुन स्थानिक रहिवाशांमध्ये वेगवेगळे मतप्रवाह आहेत. या सर्व इमारती लोड बेअरिंगच्या असून जीर्ण व धोकादायक अवस्थेत आहेत. वाढत्या लोकसंख्येमुळे परिसरातील रस्ते, पाणीपुरवठा, गाड्यांच्या पार्किंगची समस्या निर्माण होत असल्याने क्लस्टर डेव्हलपमेंट सुरक्षित आणि आधुनिक पुनर्विकासाचा सर्वोत्तम पर्याय आहे. म्हाडाने विकसकांची आर्थिक क्षमता देखील तपासावी, ज्यामुळे पुढे अडचणी येणार नाहीत, याबद्दल ठाम मत असून बहुसंख्य रहिवासी एकत्रित पुनर्विकास योजनेच्या बाजूने असल्याची भूमिका, यावेळी रहिवासी संघाच्या वतीने मांडण्यात आली आहे.

 

शासनाच्या नवीन धोरणानुसार लोकमान्य नगर परिसराचा एकात्मिक विकास करण्यास काही मोजक्या व्यक्तींनी विरोध दर्शविला आहे. परंतु बहुसंख्य रहिवासी ही योजना स्वीकारण्यास तयार असून रहिवासी संघाचे राज्य सरकार व म्हाडाला सहकार्य असल्याचं अध्यक्ष विनय देशमुख म्हणाले.

—————

 

*चौकट*

रहिवाशांचे मुख्यमंत्र्यांना साकडे

लोकमान्य नगर रहिवासी संघाच्या सदस्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील निवेदन देत हा प्रश्न जलदगतीने सोडवण्यासाठी निर्णय घेण्याची विनंती केली आहे. एकसंध असणारी कॉलनी तुकड्यांमध्ये विभागली गेल्यास नागरिकांना पायाभूत सुविधांच्या गंभीर अडचणींना सामोरे जावे लागेल. पुढील शंभर वर्षांचा विचार करून सुसज्ज एकात्मिक पुनर्विकास झाल्यास लोकमान्य नगर महाराष्ट्रातील आदर्श म्हाडा कॉलनी ठरेल, असं निवेदनात सांगण्यात आलं आहे.

 

(फोटो ओळ – लोकमान्य नगर रहिवासी संघाच्याकडून एकात्मिक विकासासाठी म्हाडाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनिल वानखेडे यांना निवेदन देण्यात आले)

 

———

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments