या समारंभात न्यूरोडायव्हर्जंट आणि बौद्धिकदृष्ट्या दिव्यांग व्यक्तींसाठी सन्मान, प्रवेश आणि संधी वाढवणाऱ्या व्यक्ती व संस्थांचा गौरव करण्यात आला
मुंबई, 16 डिसेंबर 2025: अर्थ बाय एमक्युअरने जय वकील फाउंडेशन यांच्या सहकार्याने न्यूरोडायव्हर्जंट (अशा लोकांचा समूह ज्यांची मेंदूची कार्यपद्धती विचार, शिकणे आणि वर्तनाच्या पद्धतींमध्ये सर्वसाधारण मानकांपेक्षा वेगळी असते. ही वेगळेपणाची रचना ही आजार किंवा दोष नसून मानवी विविधतेचा एक नैसर्गिक भाग मानली जाते.) आणि बौद्धिकदृष्ट्या दिव्यांग व्यक्तींसाठी शिक्षण, रोजगार, प्रतिनिधित्व आणि समुदाय सहभागाच्या माध्यमातून समावेशनाला पाठिंबा देणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांचा सन्मान करण्यासाठी मुंबईतील जुहू येथील जे डब्ल्यू मॅरिएट येथे “इनक्ल्युजन के सितारे ” या कार्यक्रमाचे आयोजन केले.
अभिनेता आमिर खान या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी अशा व्यक्तींचा स्वीकार करण्यात कुटुंबे, काळजीवाहक आणि शिक्षकांची भूमिका यावर भाष्य केले तसेच रोजच्या आयुष्यात त्यांच्या समावेशनाला अधिकाधिक लोकांनी पाठिंबा द्यावा असे आवाहन केले. या कार्यक्रमाचे आयोजन एमक्युअर फार्मास्युटिकल्सच्या कार्यकारी संचालिका आणि अर्थ बाय एमक्युअरच्या संस्थापक नमिता थापर, तसेच जय वकील फाउंडेशन यांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अर्चना चंद्रा यांनी केले. जेव्हा प्रत्येक व्यक्तीला महत्त्व दिले जाते, स्वीकारले जाते आणि समाजात समानतेने सहभागी होता येते त्यावेळीच खरे समावेशन साध्य होते यावर भर दिला.
ज्यांनी अडथळे दूर करून सर्वसमावेशक वातावरण निर्माण करण्यासाठी अर्थपूर्ण पावले उचलली आहेत अशा भारतभरातील योगदानकर्त्यांना यावेळी पुरस्कार प्रदान करण्यात आले. सन्मानार्थीमध्ये सर्वसमावेशक शिक्षणासाठी अक्षर स्कूल, सर्वसमावेशक रोजगार संधी विस्तारण्यासाठी सोल्स आर्क, सुलभ सार्वजनिक सेवा सक्षम करण्यासाठी आस्था, तसेच जबाबदार आणि सकारात्मक माध्यम प्रतिनिधित्वासाठी बडी अप नेटवर्क यांचा समावेश होता. कुटुंबांना मार्गदर्शन करणे आणि सहाय्यक मार्ग निर्माण करण्यासाठी केलेल्या वैयक्तिक प्रयत्नांसाठी डॉ. स्मिता महोबिया यांचाही गौरव करण्यात आला.
भारताचे माजी सरन्यायाधीश डॉ. न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड, बॅरियरब्रेकच्या संस्थापक शिल्पी कपूर, नॅशनल सेंटर फॉर प्रमोशन ऑफ एम्प्लॉयमेंट फॉर डिसेबल्ड पीपलचे कार्यकारी संचालक अरमान अली, अॅडव्होकेट अँड सॉलिसिटर कांचन पामनानी आणि चित्रपट दिग्दर्शक आर. एस. प्रसन्ना या परीक्षक मंडळाने पुरस्कार विजेत्यांची निवड केली. परीक्षकांनी पात्र नामांकनांचे परीक्षण करून आपल्या समुदायांमध्ये अर्थपूर्ण समावेशन पुढे नेणाऱ्यांची निवड केली.
बौद्धिकदृष्ट्या दिव्यांग मुलांचा समावेश असलेल्या एका बालगटाच्या सादरीकरणाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यातून सहभागामुळे मिळणारा आत्मविश्वास आणि आनंद प्रतिबिंबित झाला.
जर्नल ऑफ न्यूरोसायन्सेस इन रुरल प्रॅक्टिस मध्ये प्रकाशित झालेल्या 2022 च्या सूत्रबद्ध आढाव्यानुसार, भारतात बौद्धिक दिव्यांग व्यक्तींचे अंदाजे प्रमाण सुमारे 2 टक्के आहे. याचा अर्थ शिक्षण आणि समुदाय पातळीवर लाखो व्यक्तींना सातत्यपूर्ण समावेशन आणि पाठिंब्याची आवश्यकता आहे (स्रोत: पीएमसी नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिन). युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम (UNDP) च्या 2024 च्या कार्यशक्ती समावेशन अहवालानुसार, भारतातील दिव्यांग व्यक्तींचा कार्यशक्ती सहभाग दर सुमारे 36 टक्के आहे. सर्वसाधारण लोकसंख्येच्या तुलनेत हे प्रमाण खूपच कमी आहे.
समाजातील कामाच्या ठिकाणी असणारी ही दरीच सर्वसमावेशक पद्धतींचे महत्त्व अधोरेखित करते असे आयोजकांनी सांगितले. त्यामुळे अधिक शाळा, कार्यस्थळे आणि नागरी व्यवस्था प्रणाली दैनंदिन जीवनात बौद्धिकदृष्ट्या दिव्यांग व्यक्तींना पाठिंबा देण्यासाठी प्रोत्साहन देऊ शकतात.
कार्यक्रमात बोलताना श्रीमती थापर यांनी जेव्हा प्रत्येक मूल आणि प्रौढ आत्मविश्वासाने आणि योग्य पाठिंब्यासह सहभागी होऊ शकतो तेव्हाच समावेशन अर्थपूर्ण ठरते असे सांगितले. पाठिंबा देणाऱ्यांचा आणि समर्थकांचा सन्मान केल्याने कुटुंबांना त्यांच्या प्रयत्नांमध्ये प्रोत्साहन आणि मान्यता मिळते असे श्रीमती चंद्रा यांनी पुढे सांगितले.
कुटुंबे, शिक्षक आणि या भावनेला पाठबळ देणारे लोक मोठ्या संख्येने या समारंभाला उपस्थित होते. प्रत्येक व्यक्तीला समाजात आपले स्थान असण्याचा आणि समाविष्ट होण्याचा अधिकार आहे या विश्वासाने ते एकत्र आले होते.


