पुणे, दि. 6 जानेवारी : “चित्रपटांद्वारे सामाजिक प्र्रबोधन हे एक शक्तिशाली माध्यम आहे. हे समाजातील ज्वलंत मुद्दे उघड करतात. लोकांना विचार करायला लावतात. सत्य दाखवतात आणि सकारात्मक बदलासाठी प्रेरित करतात. ‘फुलपाखरू’ या लघू पटाच्या माध्यमातून नक्कीच समाज प्रबोधन होईल.” असे विचार अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी व्यक्त केले.
स्मिता गद्रे क्रिएशन्स यांच्या वतीने ‘फुलपाखरू’ या मराठी लघूपटाचे नुकतेचे स्क्रीनिंग करण्यात आले. यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
पिंपरी,चिंचवड येथील एएसएम महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित कार्यक्रम दरम्यान चित्रपट अभिनेत्री चारूशिला साबळे व अविनाश एल व्हि स्वामी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच निर्मिती व कलाकार स्मिता गद्रे उपस्थित होत्या.
या प्रसंगी मेघराज राजेभोसले यांनी आगामी ‘साम्राज्य’ या चित्रपटाची घोषणा करून पोस्टर लॉन्चिंग केले.
मेघराज राजेभोसले म्हणाले,”मराठी चित्रपट सृष्टीत तंत्रज्ञानाला अत्यंत महत्व प्राप्त झाले आहे. तंत्रज्ञानाने परिपूर्ण चित्रपट असणे गरजेचे आहे. त्यामुळे कलाकार, दिग्दर्शक, निर्मात्यांनी यावर भर द्यावा आणि जनतेसमोर उत्तम कलाकृती सादर करावी. ‘फुलपाखरू’ हा लघूपट समाजाला विचार करायला लावतो. यातून नक्कीच समाज प्रबोधन व सामाजिक समस्या सोडविण्याचा प्रयत्न होईल.”
निर्मिती स्मिता गद्रे म्हणाल्या, ” या लघूपटाच्या माध्यमातून चिड आणणार मालेगाव प्रकरण समोर आणले. समाजात कँडल मार्च व उपोषण केल्यानंतर ही अशा घटना घडतात. त्यामुळे मुलिंना प्रतिकार करण्याचे शिक्षण द्यायला हवे. त्यांना ज्युडो कराटेचे प्रशिक्षण द्यावे. त्यांच्या खिशात लाल तिखटांची पुडी ठेवावी. हल्ली वेगवेगळ्या क्लासेसमुळे मुली उशिरा घरी येतात त्यामुळे पालकांनी मुलींसाठी थोडा वेळ काढून त्यांची विचारपूस करावी. तरीपण समाजात पाशवी पण वाढतांना दिसत आहे. त्यासाठीच लघूपटासाठी ‘फुलपाखरू’ हा विषय निवडला आहे. मुलींनी आपली मानसिक आणि शारीरिक शक्ती वाढविणे गरजेचे आहे. समाजाने काही गोष्टीमध्ये बदल आणणे गरजेचे आहे. पीडित मुलींना प्रेमाची गरज आहे. समाजाने आपल्या मानसिकतेत बदल घडविला पाहिजे. हे काही सगळ एकदम होणार नाही. त्यासाठी सगळ्यांनी मिळून ४ पाउले पुढे टाकावे.”
त्यानंतर अभिनेत्री चारूशिला साबळे यांनी सांगितले की, समाजातील महत्वपूर्ण विषय हाताळून स्मिताने योग्य पद्धतीने मांडणी केली आहे. तीचा पहिला प्रयत्न असूनही बघणार्याला आनंदाबरोबरच अन्याया विरूद्ध लढण्याचे बळ देते. या नंतर स्वामी यांनी समयोचित विचार मांडले.
याशॉर्ट फिल्ममध्ये स्मिता गद्रे, सुभाष खुडे, मृणाल लोहार , केदार शिंदे आणि विशाल कल्लाप्पा चंदनशिवे यांची प्रमुख भूमिका आहे. या फिल्मची निर्मिती स्मिता गद्रे यांची असून अंकुर क्षीरसागर यांचे दिग्दर्शन आहे.
यातील कथा आणि संवाद योगेश पवार व पटकथा योगीराज परांडकर यांची आहे.


