पुणे : श्री संतसेना महाराज नाभिक एकता संघ, पुणे शहर यांच्या वतीने संतसेना महाराज पुण्यतिथी सोहळा पद्मावती येथील विणकर सभागृहात झाला. यावेळी शिक्षण क्षेत्रातील योगदानाबद्दल माध्यमिक शिक्षक विलास बाबुराव बोरसे आणि सामाजिक-राजकीय क्षेत्रातील कार्याबद्दल रा.ज.से. पक्षाचे जिल्हाध्यक्ष भगवान रघुनाथ शिंदे यांना ‘समाज भूषण पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष मनोज अहिरराव, उपाध्यक्ष पंडित निंबा निकम, उपाध्यक्ष योगेश फुलपगार आणि खजिनदार समाधान निकम कैलास नेर पगारे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमात नगरसेवक बाळा धनकवडे, सहयोग फाउंडेशनच्या अध्यक्षा बेबीताई कडेकर, नाभिक एकता संघ पुणे चे पदाधिकारी भिकन वाघ, रामदास सैंदाणे आणि नाभिक समाजबांधव उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात संत सेना महाराज पालखी सोहळ्याने झाली. त्यानंतर दीपप्रज्वलन, मान्यवरांचे स्वागत आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. ह.भ.प. अर्चना रमेश शेंडगे यांचे संत सेना महाराजांच्या जीवनकार्यावर प्रवचन झाले. त्यांनी संत सेना महाराजांनी मांडलेले भक्ती, कर्म, सेवा, समता आणि माणुसकीचे विचार उपस्थितांना सांगितले.
भगवान रघुनाथ शिंदे म्हणाले, संत सेना महाराज हे संत नामदेव महाराजांच्या समकालीन होते. संतांनी आपली जात लपविली नाही. ते जातीच्या पलीकडे होते. भक्ती आणि शक्तीचा संगम आपल्या समाजात आहे. संत सेना महाराजांच्या विचारांचे स्मरण करून ते आचरणात आणणे आवश्यक आहे, असेही त्यांनी सांगितले. दहावी बारावी चे गुणवंत विद्यार्थी अक्षरा अहिरराव तसेच वीस मुला मुलींचे ट्रॉफी देऊन सत्कार करण्यात आला आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील पगारे यांनी केले. डॉ. अरविंद झेंडे यांनी आभार मानले.


