Friday, September 11, 2026
Google search engine
HomeUncategorized“जिल्हा न्यायालये ही नागरिकांची न्यायालये आहेत; त्यामुळे जिल्हा न्यायालयांत वकिली करणारे वकील...

“जिल्हा न्यायालये ही नागरिकांची न्यायालये आहेत; त्यामुळे जिल्हा न्यायालयांत वकिली करणारे वकील हे न्यायव्यवस्थेचा महत्त्वाचा भाग आहेत” – न्यायमूर्ती अभय ओक

 

आय् एल् एस् विधी महाविद्यालय, पुणे येथे सातत्यपूर्ण विधी शिक्षण कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी न्यायमूर्ती ओक यांचा कठोर परिश्रम, कायद्यांवरील प्रभुत्व, व्यावसायिक नीतिमत्ता आणि सन्मानपूर्वक वकिलीवर भर देण्याबाबत तरुण वकिलांना मार्गदर्शन

पुणे : “जिल्हा न्यायालये ही नागरिकांची न्यायालये आहेत आणि त्यामुळे जिल्हा न्यायालयांत वकिली करणारे वकील हे न्यायव्यवस्थेचा महत्त्वाचा भाग आहेत,” असे प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती अभय ओक यांनी आय् एल् एस् विधी महाविद्यालय, पुणे येथे आयोजित सातत्यपूर्ण विधी शिक्षण कार्यक्रमाच्या (Continuing Legal Education Programme) उद्घाटनप्रसंगी केले.

विधी व्यवसायात सातत्याने शिकत राहण्याचे महत्त्व अधोरेखित करताना न्यायमूर्ती ओक म्हणाले की, कठोर परिश्रम ही वकिली व्यवसायातील यशाची गुरुकिल्ली आहे. तरुण वकिलांनी कायद्यांवर प्रभुत्व मिळवण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करावेत आणि आपली व्यावसायिक कौशल्ये सातत्याने विकसित करावीत, असे आवाहन त्यांनी केले.

इंडियन लॉ सोसायटीने अझीम प्रेमजी फाउंडेशनच्या सहकार्याने महाराष्ट्रातील नवोदित वकिलांची व्यावसायिक क्षमता आणि वकिली कौशल्ये विकसित करण्यासाठी सातत्यपूर्ण कायदे प्रशिक्षणाचा कार्यक्रम सुरू केला आहे. या उपक्रमांतर्गत सहा महिन्यांच्या प्रशिक्षण कार्यक्रमातून १५० वकिलांना प्रशिक्षण देण्यात येणार असून, प्रत्येक गटात ३० प्रशिक्षणार्थी सहभागी होणार आहेत. प्रकल्प संचालक डॉ. दीपा पातुरकर यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम राबवला जात असून, कार्यक्रम प्रमुख डॉ. वर्षा खंडागळे, कार्यक्रम व्यवस्थापक ऋचा ढमढेरे आणि सहाय्यक कार्यक्रम व्यवस्थापक रोहन रांजणे यांच्या मदतीने राबवला जात आहे.

उपस्थित प्रशिक्षणार्थींना संबोधित करताना न्यायमूर्ती ओक यांनी न्यायदान व्यवस्थेतील जिल्हा आणि तालुका न्यायालयांची महत्त्वपूर्ण भूमिका अधोरेखित केली. नागरिकांचा न्यायव्यवस्थेशी सर्वाधिक थेट संबंध या न्यायालयांमध्ये येतो. तसेच खटल्याच्या प्रारंभिक टप्प्यावर झालेल्या चुका संपूर्ण प्रकरणावर गंभीर परिणाम करू शकतात, असे त्यांनी नमूद केले. त्यामुळे नागरिककेंद्री न्यायव्यवस्थेचा पाया असलेल्या जिल्हा व कनिष्ठ न्यायालयांतील वकिलीचे महत्त्व नवोदित वकिलांनी समजून घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

वकिलीचे कौशल्य केवळ पुस्तके वाचून नव्हे, तर न्यायालयात अनुभवी वकिलांचे युक्तिवाद आणि न्यायाधीशांचे कामकाज बारकाईने पाहूनही आत्मसात करावे, असा सल्ला न्यायमूर्ती ओक यांनी नवोदित वकिलांना दिला. वकिलांनी जिज्ञासू वृत्ती ठेवावी, सतत प्रश्न विचारावेत आणि न्यायालयातील विविध प्रक्रिया कोणत्या नियम, विनियम आणि कायदेशीर तरतुदींनुसार पार पाडल्या जातात, हे समजून घेण्याचा प्रयत्न करावा, असेही त्यांनी सांगितले.

कायद्यांचे महत्त्व अधोरेखित करताना त्यांनी सांगितले की, वकिलांनी सर्व प्रकारच्या कायद्यांवर प्रभुत्व मिळवले पाहिजे. प्रभावी वकिलीसाठी केवळ मूलभूत कायद्यांचे ज्ञान पुरेसे नसून न्यायालयीन प्रक्रिया आणि कार्यपद्धतींचे सखोल ज्ञान असणेही तितकेच आवश्यक आहे.

न्यायमूर्ती ओक यांनी वकिली व्यवसायातील नीतिमत्ता आणि प्रतिष्ठेचे महत्त्वदेखील अधोरेखित केले. वकिलांनी न्यायालयाची प्रतिष्ठा जपली पाहिजे तसेच न्यायाधीश आणि न्यायसंस्थेचा आदर केला पाहिजे. न्यायालयात अनावश्यक आक्रमकता टाळून आपले म्हणणे ठामपणे, प्रभावीपणे आणि सन्मानपूर्वक मांडण्याचे कौशल्य वकिलांनी विकसित करावे, असा सल्ला त्यांनी दिला. त्याचबरोबर आपल्या पक्षकारांशी निष्पक्ष आणि प्रामाणिक राहणे हीदेखील वकिलांची महत्त्वाची जबाबदारी असल्याचे त्यांनी नमूद केले.

या प्रसंगी बोलताना ज्येष्ठ विधिज्ञ श्री. एस. व्ही. कानेटकर यांनी न्यायाधीश आणि वकील हे “न्यायव्यवस्थेच्या रथाची दोन चाके आहेत” असे नमूद केले. सर्वसामान्य नागरिकांचा न्यायव्यवस्थेवर प्रचंड विश्वास असल्यामुळे वकिलांवर मोठी जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले. वकिलांनी प्रकरणांची प्रभावीपणे मांडणी करून न्यायालयाला योग्य आणि न्याय्य निर्णयापर्यंत पोहोचण्यासाठी सहाय्य केले पाहिजे, जेणेकरून पक्षकाराला न्याय मिळू शकेल, असे त्यांनी सांगितले.

कुशल विधिज्ञांची आवश्यकता अधोरेखित करताना श्री. कानेटकर यांनी नवोदित वकिलांना प्रत्यक्ष न्यायालयीन कामकाजाचा अनुभव घेण्यावर भर देण्याचे आणि सातत्यपूर्ण सरावातून आपली कायदेशीर कौशल्ये विकसित करण्याचे आवाहन केले.

इंडियन लॉ सोसायटीच्या मानद सचिव वैजयंती जोशी यांनी संस्थेच्या १०३ वर्षांच्या गौरवशाली परंपरेचा आढावा घेतला आणि विधी शिक्षण तसेच विधी व्यवसायाच्या विकासामध्ये इंडियन लॉ सोसायटीने दिलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाविषयी माहिती दिली.

आय् एल् एस् विधी महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या आणि प्रकल्प संचालक डॉ. दीपा पातुरकर यांनी सातत्यपूर्ण विधी शिक्षण कार्यक्रमाची सविस्तर माहिती दिली. हा कार्यक्रम प्रत्यक्ष आणि ऑनलाइन अशा दोन्ही पद्धतींनी राबविण्यात येणार असून, प्रत्येक गटात ३० वकील सहभागी होतील, असे त्यांनी सांगितले. या उपक्रमाचा महाराष्ट्रातील एकूण १५० नवोदित वकिलांना लाभ होणार आहे.

प्रकल्प व्यवस्थापक ऋचा ढमढेरे यांनी उद्घाटन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले आणि आभार मानले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments