पुणे, 12 सप्टेंबर: राष्ट्रीय एकतेचे बीज पेरण्याचा महत्त्वाचा धागा पकडून धनकवडी येथील 9 गणेश मंडळांनी एकत्रित येऊन सर्वात मोठी एकत्रित सार्वजनिक मिरवणूक काढण्यात येणार आहे. या वर्षी “कृत्रिम बुद्धिमत्ता फायदे आणि भविष्य” या विषयावरील चित्ररथाची मिरवणूक काढण्यात येणार आहे. ज्याचा शुभारंभ सोमवार दि. 14 सप्टेंबर रोजी जागतिक ख्यातीचे आयटी व एआय तज्ज्ञ व्याख्याते व लेखक डॉ. दीपक शिकारपूर आणि प्रख्यात एआय तज्ज्ञ लेखक आणि संशोधक डॉ. अमेय पांगारकर हे धनकवडी येथील गुलाबनगर मध्ये दुपारी 12 वाजता करतील. अशी माहिती मंडळाच्या अध्यक्षांनी सांगितले.
‘कल्पना असेल जिथे एआय करेल चमत्कार तिथे, ‘माणसाची बुद्धिमत्ता, तंत्रज्ञानाची साथ, एआय बदलेल संपूर्ण जगातली वाट, या स्लोगननुसार या वर्षी चित्ररथाची मिरवणूक काढण्यात येणार आहे. आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (एआय) हा शब्द नसून हा अत्यंत वेगाने बदलणाऱ्या जगातील एक अत्यंत बलवान असा बदल आहे. सुरवातीच्या आणि अलीकडच्या काळामध्ये जी प्रगती आपल्याला दिसून येते तो बदल म्हणजे एआय होय. वर्तमानकाळाला तंत्रज्ञानाचे युग म्हंटले जाते या काळामध्ये सर्वात परवलीची संकल्पना कुठली असेल तर ती म्हणजे एआय. सध्या कुठल्याही क्षेत्रात वेगवान बदल घडत असेल तर ते हेच क्षेत्र आहे. हीच माहिती शोभायात्रेच्या माध्यमातून प्रत्येक गणेश भक्ताला देण्यात येणार आहे.
‘सन्मान प्रत्येक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा, अभिमान प्रत्येक कार्यकर्त्यांचा’ या स्लोगननुसार धनकवडी येथील साईनाथ मित्र मंडळ, शिव छत्रपती मित्र मंडळ, आदर्श मित्र मंडळ, फाईव्ह स्टार मित्र मंडळ , केशव कॉप्लेक्स मित्र मंडळ, जय महाराष्ट्र मित्र मंडळ, विद्यानगरी मित्र मंडळ, रामकृष्ण मित्र मंडळ, आणि अखिल मोहननगर मित्र मंडळ एकत्रित येऊन शोभायात्रा काढणार आहेत. 9 गणेश मंडळांनी मोठ्या संख्येने एकत्रित येऊन देशातील सर्वात मोठ्या एकत्रित मिरवणूकीचे आयोजन सोमवार दि. 14 सप्टेंबर रोजी दुपारी 12 ते सायं. 4 वाजेपर्यंत करण्यात येणार आहे. या मध्ये जवळपास 8 ते 10 हजार गणेश भक्त सहभागी होणार आहेत. ही मिरवणूक गुलाबनगर, धनकवडी येथून सुरू होऊन धनकवडी गाव, केशव कॉम्प्लेक्स, विद्यानगरी शिवशंकर चौक ते मोहनगर येथे काढण्यात येत आहे. या मध्ये ज्ञानप्रबोधिनी पथक असणार आहे.
त्याचप्रमाणे सर्व मंडळांच्या सहयोगाने संपूर्ण वर्षभर समाजउपयोगी कार्यक्रम चालविले जाणार आहेत. त्यामुळे या कार्यात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभाग घ्यावा. गेल्या वर्षी धनकवडी मध्ये 9 गणेश मंडळांनी एकत्रित येऊन मिरवणूकीचा उपक्रम यशस्वीपणे पार पाडला होता. या वर्षी याच कार्याची रेघ पुढे ओढत 9 गणेश मंडळांनी सहभाग घेऊन ही मिरवणूक यशस्वीपणे पुर्ण करण्याचा संकल्प घेतला आहे.
यावेळी अनिरुद्ध येवले, प्रतिक कुंभार, विजय क्षीरसागर, अभिषेक तापकीर, आनंद शिंदे, सोमनाथ शिर्के, संतोष धनकवडे, उदय जगताप, उदय भोसले, करण कदम, आदित्य झाड, उदय गुंडपाटील, अक्षय गोरे, शिरीष देशपांडे अन्य मंडळाचे अध्यक्ष उपस्थित होते.


