नवी मुंबईतील प्रसिद्ध अशा मिलेनियम टॉवर्सच्या, सह्याद्री गृहनिर्माण संस्थेतील युवकांनी पुढाकार घेऊन श्री गणेशाची प्रतिष्ठापना केली. या निमित्ताने सात दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
गणेशोत्सवाच्या निमित्ताने मुलांसाठी चित्रकला स्पर्धा, मल्लखांब, महिलांसाठी पाककला स्पर्धेचे उत्तमरित्या आयोजन करण्यात आले होते, तर रहिवासी महिलांनी मराठी, हिंदी, सिंधी, तसेच दाक्षिणात्य भाषांत भक्तिगीते गाऊन विविधतेत एकतेचे दर्शन घडविले. कराओके गाण्यांनी सर्वांना खुश केले. चौथ्या दिवशी “५६ भोग”चे उत्कृष्ट आयोजन करण्यात आले होते, त्यामुळे सर्वांनी विविध पदार्थांचा प्रसाद म्हणून आस्वाद घेतला. या वेळी सर्व महिलांसाठी हळदीकुंकू कार्यक्रम करण्यात आला.
पाचव्या दिवशी आणि विसर्जनाच्या वेळी महाप्रसादाचे आयोजन अतिशय शिस्तबद्ध रीतीने करण्यात आले.
रोज सकाळ संध्याकाळ आरती, नंतर वेगवेगळा प्रसाद या युवकांना मिळालेली सर्व रहिवाश्यांची साथ, यामुळे विविध धर्माचे, प्रदेशाचे, भाषांचे नागरिक रहात असलेल्या, २२५ सदनिकांच्या गृहनिर्माण संस्थेतील वातावरण आठवडाभर अतिशय प्रफुल्लित, मंगलमय आणि परस्पर सद्भावाचे होते.
लोकमान्य टिळकांनी ज्या उद्देशाने गणेशोत्सव सुरू केला, त्याचे जणू दर्शनच झाले.
ज्येष्ठांची भेट :
या गणेशाचे दर्शन घेण्यासाठी तसेच सर्व युवकांचे कौतुक करण्यासाठी सतत सक्रिय असलेल्या “सानपाडा जेष्ठ नागरिक संघा”च्या पदाधिकारी आणि सदस्यांनी आवर्जून भेट दिली. यावेळी संघाचे अध्यक्ष श्री मारुती कदम, उपाध्यक्ष श्री विठ्ठल गव्हाणे, खजिनदार श्री व्ही जी मुखेकर, सदस्य सर्वश्री कामगार नेते श्री मारुती विश्वासराव, श्री गव्हाणे, श्री वाजे, श्री देवेंद्र भुजबळ आदी उपस्थित होते.
युवक सर्वश्री भूषण म्हसे, मिहिर बोरा, आदित्य शेट्टी, नितेश वाणी यांनी सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. त्यानंतर करण्यात आलेल्या आदरातिथ्याने सर्व मान्यवर भारावून गेले.
विशेष म्हणजे या गणपती बाप्पाच्या ओढीने आदित्य जर्मनी हून तर नितेश बंगलोर येथून आले आहेत.
विसर्जन :
बाप्पाचे विसर्जनवेळी सर्व जण लेझीम खेळले. ५१ जणींनी घरून दिव्याचे ताट तयार करून आणले आणि आरती केली, अतिशय मनमोहक दृश्य होते ते. सोसायटीतील युवापिढीने सर्व गोष्टीमध्ये मनसोक्त भाग घेऊन, युवापिढी बिघडली आहे हा समज खोटा ठरविला.


