फलटण:प्रत्येक व्यक्तीने आपले जीवन जगत असताना संयम, चिकाटी, प्रेम, अचूकता, व्यवसायात सच्चेपण आचरणात आणल्यास आनंदी जीवनाची ती गुरुकिल्ली असेल असे प्रतिपादन फलटण येथील प्रसिद्ध अस्थिरोग तज्ञ डॉक्टर प्रसाद जोशी यांनी परशुराम पुरस्कार स्वीकारताना केले.
अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था नाशिक, केंद्र फलटण यांच्या तर्फे नवलबाई मंगल कार्यालय येथे परशुराम व शारदा पुरस्काराचे वितरण करण्यात आले. त्यावेळी डॉक्टर प्रसाद जोशी पुरस्कार स्वीकारताना बोलत होते. या संस्थेचा यावर्षीचा परशुराम पुरस्कार डॉक्टर प्रसाद जोशी व डॉक्टर प्रसन्न जोशी या जुळ्या भावंडांना प्राप्त झाला. तर शारदा पुरस्कार दापोली येथील शिक्षण व मनसोपचार तज्ञ डॉक्टर धनश्री जोशी दांडेकर यांना प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी अजय श्रीनिवास दाते तर नाशिक कार्यालयाचे कार्यवाह डॉक्टर सुहास भणगे, फलटण केंद्राचे प्रमुख श्री विजय ताथवडकर, पुणे येथील डॉक्टर संध्याताई भिडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या प्रारंभी दीप प्रज्वलन व भगवंत परशुराम यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले. केंद्रप्रमुख विजय ताथवडकर यांनी सर्वांचे स्वागत करून केंद्राच्या विविध कार्यक्रमाची माहिती दिली. आजपर्यंत ज्यांना ज्यांना पुरस्कार दिले त्याबद्दल केंद्र सर्वांचे आभारी आहे असे मनोगत व्यक्त केले. हा पुरस्कार कै. काशिनाथ वादे व कै. सत्यभामा लेले यांच्या कुटुंबीयांमार्फत दिला जातो असे सांगितले.
यावेळी बोलताना डॉक्टर प्रसन्न जोशी यांनी सांगितले की, मी उच्च शिक्षण घेऊन माझ्या आयुष्यातील बरेच वर्ष अमेरिकेत कार्य केले. वडिलांचा मला थोडाफार सहवास लाभला. तरुण पिढीने प्रत्येकाने जीवनात तंत्रज्ञानाचा वापर करून प्रगती करावी व समाजासाठी परोपकाराची भावना ठेवून कार्य करावे व उत्तुंग यश संपादन करावे असे सांगितले.
डॉक्टर धनश्री जोशी दांडेकर यांनी सांगितले की शिक्षण क्षेत्रातील कार्यामुळे मला हा पुरस्कार मिळाला. एवढ्या कमी वयात माझे कार्य पाहून हा पुरस्कार दिल्याबद्दल मी त्यांचे आभारी आहे.
यामुळे काम करण्याची प्रेरणा मिळेल. बालपण व शिक्षण फलटण येथे झाले असून अनेकांनी मला सहकार्य केले.
डॉक्टर संध्याताई भिडे यांनी सांगितले की डॉक्टर प्रसाद जोशी यांनी प्रारंभी काही काळ आमच्या समवेत कार्य केले. आज 25 वर्षे त्यांच्या कार्याला होत असून त्यांच्या सामाजिक व सांस्कृतिक ठेवा या फलटणमध्ये फुलवला. त्यांची जिद्द, चिकाटी सर्वांनाच प्रेरणादायी आहे असे त्यांनी सांगितले.
अध्यक्ष अजय श्रीनिवास दाते यांनी सांगितले की, प्रत्येकाला योग्य सत्संग व गुरु मिळाला तर भाग्य मिळते हे आजच्या पुरस्काराने दाखवून दिले आहे. भगवान परशुराम यांच्या चिरंजीव अवताराने पृथ्वीतलावर चांगले दिवस पहात आहोत असे सांगून त्यांचे जीवन पूर्णपणे कथन केल. यावेळी निमिष विष्णूप्रद याने आंतरराष्ट्रीय पातळीवर रोबोट स्पर्धेत यश मिळवल्याबद्दल त्याच्या परिवारासह त्याचा सन्मान करण्यात आला. प्रमुख पाहुण्यांची ओळख निखिल केसकर अनिरुद्ध रानडे व सौ अस्मिता रानाडे यांनी करून दिली तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर माधुरी दाणी, निखिल केसकर यांनी केले तर आभार नंदकुमार केसकर यांनी मानले. या कार्यक्रमास डॉक्टर अवधूत गुळवणी, डॉक्टर हेमलता गुळवणी,श्रीपाद विभुते संजय दाते यांचे सह कार्यकारणी सभासद व निमंत्रित मोठ्या संख्येने उपस्थित होते. पसायदान होऊन कार्यक्रमाची सांगता झाली.


