पुणे – उन्हाळा आला की बहुधा अन्न पाण्याच्या शोधात वानरांच्या टोळ्या शहरात येत आहेत.त्याचा त्रास नागरिकांना होत आहे.
आत्ताच अशीच एक टोळी नारायण पेठेतील पुणे मनपा च्या हरिभाऊ साने वाहनतळाच्या आवारात आलीये. दोन दिवसापूर्वी कोंढवे धावडे च्या पुढे खडकवासला धरणालगत देखील रस्त्यावर अशीच एक टोळी ठाण मांडून होती.
अद्याप पर्यंत ह्या टोळ्यांनी कोणावर हल्ला केलेला नाही किंवा कोणास इजा पोहोचवलेली नाही, मात्र मध्यवस्तीत लहान मुलं किंवा इतरांना त्रास होऊ शकतो.
याबाबत पुणे मनपाचे उद्यान अधीक्षक श्री. अशोक घोरपडे यांच्याशी संपर्क साधला असता ” मनपा चे रेस्कयु सेंटर वन विभागाच्याच सूचनेनुसार बंद करण्यात आले असून याबाबत वन विभागाशीच संपर्क साधावा ” असे त्यांनी सांगितले.
त्यास अनुसरून भारतीय जनता पक्षाचे प्रदेश प्रवक्ते संदीप खर्डेकर यांनी पुणे वन विभागाचे उपवनसंरक्षक डॉ.माधव मोहिते यांना एक निवेदन सादर केले आहे.
याबाबत योग्य ती कार्यवाही करावी व नागरिकांना देखील दक्षता घेण्याबाबत सूचना कराव्यात अशी आग्रही मागणी खर्डेकर यांनी या निवेदनाद्वारे केली आहे


