Pune, 15 May 2026: मान्सूनपूर्व प्रतिबंधात्मक उपक्रमांना सुरुवात करताना दरवर्षी १६ मे रोजी देशभरात राष्ट्रीय डेंग्यू दिन साजरा केला जातो. डेंग्यूला प्रतिबंध करण्यासाठी व्यक्ती, कुटुंबे आणि समुदाय या सर्वांकडून सातत्यपूर्ण प्रयत्नांची आवश्यकता असते, याचे हे एक स्मरण असते. यंदा वाढते तापमान आणि बदलत्या हवामनामुळे संपूर्ण भारतात डेंग्यूचा धोका अधिक आहे. त्यामुळे हे स्मरण पूर्वीपेक्षा अधिक महत्त्वाचे ठरते.
भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) असा अंदाज वर्तवला आहे की, २०२६ मध्ये देशाच्या मोठ्या भागांमध्ये सामान्यपेक्षा जास्त तापमान आणि उष्णतेच्या लाटेचे अधिक दिवस अनुभवायला मिळतील. त्यामुळे हे वर्ष आतापर्यंतच्या सर्वात उष्ण वर्षांपैकी एक ठरण्याची शक्यता आहे. जगभरातील शास्त्रज्ञांनी असा इशाराही दिला आहे की एल निनोसारख्या हवामान पद्धतींमुळे तीव्र हवामान घटना अधिक घतक होऊ शकतात आणि रोगराईचा धोका वाढेल. अशा परिस्थितीमुळे डेंग्यूचा धोका वाढण्याची शक्यता आहे, कारण जास्त तापमानामुळे कीटकजन्य रोगांच्या प्रसारासाठी अनुकूल वातावरण निर्माण होते. त्याचा परिणाम म्हणून भारतीय शहरे डेंग्यूच्या प्रसारासाठी प्रमुख हॉटस्पॉट म्हणून उदयास येत आहेत.
डेंग्यू आता केवळ पावसाळ्यापुरता मर्यादित राहिलेला नाही, तर ती आता वर्षभरातील सार्वजनिक आरोग्यासाठी चिंतेची बाब बनली आहे. पारंपरिक हंगामी उच्चांकानंतरच्या काळातही रुग्ण आढळून येत आहेत. वेगाने होणारे शहरीकरण, वाढते तापमान आणि बदलणारे हवामान डेंग्यूच्या प्रसाराला गती देत आहेत. याव्यतिरिक्त लोकसंख्येची उच्च घनता, अनियोजित बांधकाम आणि पाणी साठवण्याच्या पद्धती यांसारखे घटक डासांच्या प्रजननासाठी आदर्श परिस्थिती निर्माण करत आहेत.
जगभरातील डेंग्यूच्या एकूण रुग्णांपैकी जवळपास एक तृतीयांश रुग्ण भारतात आहेत आणि मागील दोन दशकांत त्याचा प्रसार अकरा पटीने वाढला आहे. डेंग्यू भारताच्या बहुतेक भागांमध्ये दिसून येतो आणि त्यामुळे ठराविक कालावधीत वार्षिक उद्रेक होतो. त्यात जवळपास प्रत्येक प्रदेशातून रुग्ण आढळतात. आता भारताच्या दक्षिण आणि पश्चिम भागांमध्ये तो बारमाही (वर्षभर) झाला आहे.
आता पारंपरिक पावसाळ्याच्या महिन्यांव्यतिरिक्त इतर काळातही आणि पूर्वी कमी धोका असलेल्या भागांमध्येही याची नोंद होत आहे. त्यात हिमाचल प्रदेश आणि ईशान्य भारतातील काही भागांसारख्या उंच प्रदेशांचा समावेश आहे. धोक्याची पातळी आणखी वाढण्याची शक्यता आहे, कारण २०५० पर्यंत अंदाजे १.५ अब्ज भारतीय डेंग्यूच्या धोक्याच्या क्षेत्रात राहतील असा अंदाज आहे. डेंग्यू सर्व वयोगटातील लोकांना होऊ शकतो; तथापि, काही विशिष्ट गटांना डेंग्यूचा जास्त धोका असतो. १५ वर्षांखालील मुलांमध्ये रुग्णांची संख्या जास्त असते आणि त्यांची रोगप्रतिकारशक्ती विकसित होत असल्यामुळे त्यांना डेंग्यूचा धोका जास्त असतो. मधुमेह, उच्च रक्तदाब, लठ्ठपणा आणि हृदयरोग यांसारखे आजार असलेल्या प्रौढांमध्येही गुंतागुंत होण्याची शक्यता जास्त असते. याशिवाय, भारतात डेंग्यूचे चारही प्रकार प्रचलित आहेत. याचा अर्थ व्यक्तीला अनेक वेळा संसर्ग होऊ शकतो, आणि दुसऱ्यांदा होणाऱ्या संसर्गामुळे अनेकदा आजार अधिक गंभीर होतो व रुग्णालयात दाखल होण्याचा धोका वाढतो.
सह्याद्री सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, पुणे येथील सल्लागार डॉक्टर डॉ. अतुल जोशी म्हणाले: “आम्हाला आता पारंपरिक हंगामाव्यतिरिक्त अगदी पावसाळापूर्व महिन्यांमध्येही डेंग्यूचे रुग्ण वाढत्या प्रमाणात दिसून येत आहेत. यावरून असे सूचित होते की, डेंग्यू आता केवळ हंगामी राहिलेला नाही तर त्याचा शहरांमध्ये वर्षभर धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे पावसाळा सुरू होण्यापूर्वीच प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. आमच्याकडे दर महिन्याला ५-६ डेंग्यूचे रुग्ण आढळतात आणि मान्सूनच्या काळात ही संख्या अनेक पटींनी वाढते. डेंग्यूचे डास पहाटे आणि दुपारनंतर म्हणजेच ज्या वेळी लोक सक्रिय असतात, त्याच वेळी सर्वाधिक सक्रिय असतात. त्यामुळे ते चावण्याची आणि रोगप्रसाराची शक्यता वाढते. याशिवाय हे डेंग्यूचे डास शहरांमध्ये अधिक वेळा घरांमध्ये शिरत आहेत आणि त्यांच्या नेहमीच्या सक्रिय वेळेनंतरही लोकांना चावत आहेत. कृत्रिम प्रकाश आणि उबदार तापमान अशा गोष्टी त्यांना जास्त काळ सक्रिय ठेवू शकतात. त्यामुळे त्यांच्या चावण्याची वेळ संध्याकाळपर्यंत वाढते. यामुळे घरातील प्रत्येकासाठी धोक्याचा कालावधी आणि रोगाचा प्रसार वाढतो. वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर डेंग्यूचे बदलते धोक्याचे घटकही समजून घेणे महत्त्वाचे आहे. साचलेले पाणी काढून टाकणे, दिवसभर आणि रात्री उशिरापर्यंत डास प्रतिबंधक वापरणे आणि सामुदायिक जागरूकता वाढवणे यांसारख्या व्यापक प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक आहे. योग्य निगराणीमुळे प्रसार रोखण्यास आणि सार्वजनिक आरोग्याचे रक्षण करण्यास लक्षणीय मदत होऊ शकते. डेंग्यू प्रतिबंध सातत्यपूर्ण असणे आवश्यक आहे आणि त्यात घरातील व घराबाहेरील दोन्ही वातावरणांचा समावेश असावा.”
डेंग्यूची लक्षणे साधारणपणे डास चावल्यानंतर ४ ते १० दिवसांनी सुरू होतात आणि त्यात तीव्र ताप, तीव्र डोकेदुखी, आणि कानाच्या मागे वेदना यांचा समावेश असू शकतो. डोळे, स्नायू आणि सांधेदुखी, मळमळ, उलट्या आणि अंगावर पुरळ येणे अशीही लक्षणे दिसतात. बरीच प्रकरणे सौम्य असली तरी ताप कमी झाल्यावर धोक्याची चिन्हे दिसू शकतात आणि त्याकडे दुर्लक्ष करू नये. यात तीव्र पोटदुखी, सतत उलट्या होणे, हिरड्यांमधून किंवा नाकातून रक्त येणे, प्रचंड थकवा, अस्वस्थता आणि उलट्या किंवा शौचातून रक्त येणे यांचा समावेश आहे.
वेळेवर उपचार न केल्यास गंभीर डेंग्यू सुमारे २० टक्के प्रकरणांमध्ये जीवघेणा ठरू शकतो आणि त्यामुळे शरीरातून पाणी गळणे, डेंग्यू शॉक सिंड्रोम आणि अनेक अवयव निकामी होणे यांसारख्या गोष्टी घडू शकतात. त्यामुळे कुटुंबे आणि आरोग्यसेवा प्रणालीवर अतिरिक्त भार पडतो. डेंग्यूचा प्रसार करणारा एडीस इजिप्ती डास दाट लोकवस्तीच्या शहरी वातावरणात मोठ्या प्रमाणात आढळतो आणि घरांमध्ये सामान्यतः आढळणाऱ्या पाण्याच्या टाक्या, बादल्या, फुलदाण्या आणि टाकून दिलेल्या भांड्यांसारख्या स्वच्छ, साचलेल्या पाण्याच्या लहान साठ्यांमध्ये त्याची पैदास होते. परिणामी डेंग्यू अनेकदा घरे आणि समुदायांमध्ये समूहांमध्ये पसरतो. तसेच काही संक्रमित डासदेखील अनेक लोकांपर्यंत विषाणूचा प्रसार करू शकतात. संसर्गाचा धोका कमी करण्यासाठी घरे, शाळा, परिसर आणि कार्यालयांमध्ये नियमित तपासणी करणे, तसेच साचलेले पाणी काढून टाकणे, डास प्रतिबंधक वापरणे, पूर्ण बाह्यांचे कपडे घालणे आणि कोणतीही लक्षणे दिसल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. हवामान आपल्या नियंत्रणात नसले तरी, आपल्या घरांमध्ये आणि आजूबाजूला पाणी साचू न देणे आणि आपला परिसर स्वच्छ ठेवणे निश्चितच आपल्या नियंत्रणात आहे. रूग्णांची संख्या वाढण्यापूर्वीच कुटुंबे, शाळा आणि समुदायांनी कृती केली पाहिजे, कारण कुटुंबे आणि स्थानिक समुदाय या दोघांचेही संरक्षण करण्यात वैयक्तिक कृती महत्त्वाची भूमिका बजावते. सामाजिक पातळीवर रहिवासी कल्याण संघटना, परिसरातील गट, शाळा आणि स्थानिक प्राधिकरणांनी सार्वजनिक जागा स्वच्छ ठेवण्यासाठी, कचरा व्यवस्थापन सुधारण्यासाठी आणि डासांच्या प्रजननाची ठिकाणे नष्ट करण्यासाठी एकत्र काम केले पाहिजे.
कीटक नियंत्रण महत्त्वाचे असले तरी फक्त तेवढेच पुरेसे नाही. जागतिक आरोग्य संघटना स्थानिक भागांमध्ये डास नियंत्रण, वैयक्तिक संरक्षण, सामुदायिक सहभाग आणि लसीकरण यांसारख्या एकात्मिक डेंग्यू प्रतिबंधक धोरणांची शिफारस करते. कोणताही विशिष्ट विषाणूरोधक उपचार उपलब्ध नसल्यामुळे डेंग्यूमुळे होणारे आजार आणि रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रतिबंध हाच सर्वात प्रभावी मार्ग आहे. वैयक्तिक कृती सातत्याने केली जाते तेव्हा ती सामूहिक संरक्षणात योगदान देते आणि संक्रमणाची साखळी तोडण्यास मदत करते. त्यामुळे, लहान समूहांचे मोठ्या साथींमध्ये रूपांतर होण्याचा धोका क
मी होतो.


