Thursday, September 17, 2026
Google search engine
HomeUncategorizedजनतेनी सायबर फसवणुकीपासून सावध राहण्याचा संदेश; ‘लोकसंवाद’मधून नागरिकांना मार्गदर्शन* ...

जनतेनी सायबर फसवणुकीपासून सावध राहण्याचा संदेश; ‘लोकसंवाद’मधून नागरिकांना मार्गदर्शन* *मोबाईल हरवल्यास तातडीने तक्रार करा; शेअर बाजाराच्या नावाखालील बनावट ‘फेसबुक’, ‘टेलिग्राम’, ‘व्हॉट्सॲप’ ग्रुपपासून दूर राहण्याचे आवाहन*

 

 

पुणे, दि. १७ : गणेशोत्सवाच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजना, उपक्रम आणि नागरिकांच्या सुरक्षिततेशी संबंधित महत्त्वाची माहिती थेट जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या ‘लोकसंवाद-२०२६’ उपक्रमांतर्गत तुळशीबाग गणेश मंडळासमोर नागरिकांना सायबर सुरक्षेबाबत मार्गदर्शन करण्यात आले. सायबर पोलीस उपनिरीक्षक योगिता कुदळे यांनी नागरिकांशी संवाद साधताना मोबाईल चोरी, ऑनलाइन फसवणूक तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीच्या नावाखाली होणाऱ्या फसवणुकीपासून सावध राहण्याचे आवाहन केले.

 

मोबाईल हरवल्यास घाबरून न जाता तातडीने संबंधित यंत्रणेकडे ऑनलाइन तक्रार नोंदवावी तसेच आवश्यकतेनुसार सीआयआर नोंदविण्याची कार्यवाही करावी, असे त्यांनी सांगितले. हरवलेल्या मोबाईलचा गैरवापर होऊ नये यासाठी नागरिकांनी विलंब न करता आवश्यक खबरदारी घेणे महत्त्वाचे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

 

शेअर बाजारातील गुंतवणूक, प्रशिक्षण किंवा अधिक परताव्याचे आमिष दाखवून नागरिकांना विविध ‘फेसबुक’, ‘टेलिग्राम’ आणि ‘व्हॉट्सॲप’ ग्रुपमध्ये सहभागी करून घेण्याचे प्रकार वाढत आहेत. अशा अनोळखी किंवा संशयास्पद ग्रुपमध्ये सहभागी होऊ नये. अल्पावधीत मोठा आर्थिक लाभ मिळवून देण्याचे आमिष दाखविणारे संदेश, लिंक किंवा व्यक्तींच्या भूलथापांना बळी पडू नये, असे आवाहनही उपनिरीक्षक कुदळे यांनी केले.

 

गणेशोत्सवाच्या निमित्ताने नागरिक मोठ्या संख्येने एकत्र येत असल्याने ‘लोकसंवाद-२०२६’च्या माध्यमातून शासकीय योजनांसोबतच नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित सुरक्षिततेच्या बाबींविषयीही जनजागृती करण्यात येत आहे. नागरिकांनी कोणतीही ऑनलाइन आर्थिक व्यवहाराची माहिती, गोपनीय संकेतांक किंवा इतर संवेदनशील माहिती अनोळखी व्यक्तीला देऊ नये, तसेच फसवणूक झाल्यास तातडीने संबंधित यंत्रणेशी संपर्क साधावा, असेही यावेळी सांगण्यात आले.

 

‘बाप्पाचे दर्शन घेताना सुरक्षिततेचाही संदेश ऐका’, या उद्देशाने नागरिकांशी थेट संवाद साधत सायबर सुरक्षेबाबत जनजागृती करण्यात येत असल्याने ‘लोकसंवाद’ उपक्रमाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

यावेळी तुळशीबाग गणपती मंडळाचे अध्यक्ष विकास पवार आणि मंडळाचे इतर सदस्य उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments