पुणे, दि. १७: पुणे विभागाच्यावतीने रब्बी हंगामातील कडधान्य आत्मनिर्भरता अभियान योजनेअंतर्गत सन २०२६-२७ हरभरा, मसूर पिकाकरिता प्रमाणित बियाणे वितरण घटकाचा लाभ देण्यात येणार आहे. इच्छुक शेतकऱ्यांनी महाडीबीटी संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करावेत, असे आवाहन विभागीय कृषी सहसंचालक बाबासाहेब जेजुरकर यांनी केले आहे.
शासनाकडून हरभरा पिकाचे ५ वर्षापेक्षा कमी कालावधीचे वाण (अधिसूचनेच्या दिनांकापासून ३ वर्ष) किंमतीच्या ७५ टक्के किंवा ६ हजार रुपये प्रति क्विंटल (यापैकी जे कमी असेल ते) व ५ वर्षापेक्षा जास्त परंतू १० वर्षापेक्षा कमी कालावधीचे वाण किंमतीच्या ५० टक्के किंवा ४ हजार रुपये प्रति क्विंटल (यापैकी जे कमी असेल ते) तसेच मसूर पिकात ५ वर्षापेक्षा कमी कालावधीचे वाण (अधिसूचनेच्या दिनांकापासून ३ वर्ष) किंमतीच्या १०० टक्के किंवा १२ हजार रुपये प्रति क्विंटल (यापैकी जे कमी असेल ते) अनुदानावर लाभ दिला जात आहे. प्रति शेतकरी कमाल १ हेक्टर पर्यंत मर्यादेत आर्थिक साहाय्य देण्यात येणार आहे.
प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर लाभार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे. अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांकडे शेतकरी ओळखत्र (फार्मर आयडी) असणे बंधनकारक असून https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/AgriLogin/AgriLogin या संकेतस्थळावर अर्ज सादर करावे. यापूर्वी लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांना पुढील दोन वर्षे लाभ दिला जाणार नाही. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर लाभार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे. योजनेच्या अधिक माहितीसाठी संबंधित तालुका कृषी अधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अहिल्यानगर, पुणे व सोलापूर या कार्यालयाशी संपर्क साधावा, असेही श्री. जेजुरकर यांनी कळविले आहे.
*बाबासाहेब जेजुरकर, विभागीय कृषी सहसंचालक, पुणे:* यंदाचे वर्ष ‘आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्षʼ असल्यामुळे महिला शेतकऱ्यांना प्राधान्याने लाभ देण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे, तरी अधिकाधिक महिला शेतकरी खातेदारांनी अर्ज करावेत.
0000


