पिंपरी, दि. १८ जानेवारी २०२५ :- ‘दिव्यांगांना एक सक्षम मित्र मिळाला, तर दिव्यांग बांधव नक्कीच उंच भरारी घेतील. दिव्यांग बांधवांचे सुप्त कलागुण शोधून, त्यादृष्टीने प्रशिक्षण देऊन, त्यांना रोजगार उपलब्ध करून दिल्यास ते नक्कीच यशाकडे झेप घेतील,’ असा विश्वास दिव्यांगांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी काम करणाऱ्या विविध संस्थांच्या प्रतिनिधींनी व्यक्त केला. निमित्त होते ‘पर्पल जल्लोष’ कार्यक्रमात ‘कौशल्य आणि व्यावसायिक प्रशिक्षण’ या विषयावर आयोजित करण्यात आलेल्या चर्चासत्राचे.
पिंपरी चिंचवड महापालिका आणि दिव्यांग भवन फाऊंडेशन आयोजित ‘पर्पल जल्लोष – दिव्यांगांचा महाउत्सव’ या कार्यक्रमात शनिवारी (१८ जानेवारी) दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात ‘कौशल्य अआणि व्यावसायिक प्रशिक्षण’ या विषयावर चर्चासत्र झाले. या चर्चासत्रात स्वयंदीप महिला फाऊंडेशनच्या अध्यक्ष मीनाक्षी निकम व पिंपरी चिंचवड औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य शशिकांत पाटील हे सहभागी झाले होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचाल लातूर येथे दिव्यांग बांधवांसाठी प्रथमच आय टी आय कोर्स सुरु करणारे संवेदना प्रकल्पचे डॉ. योगेश नितुरकर यांनी केले.
संवेदना महिला फाऊंडेशनच्या मीनाक्षी निकम म्हणाल्या, ‘मी लहान असताना मला पोलिओ झाला, आणि मला अपंगत्व आले. मी सातवीत असताना माझ्या वडिलांचे निधन झाले. त्यानंतर खऱ्या अर्थाने अपंगत्व काय असते, याची जाणीव झाली. यातूनच मला काहीतरी वेगळे करण्याची जिद्द मिळाली. त्यानंतर मी घरातील शिवण मशीनवर काम सुरु केले. पुढे हेच क्षेत्र माझे करिअर बनले आणि या माध्यमातून तब्बल १५० कुटुंबांना रोजगार उपलब्ध करून दिला. यातूनच अनेक महिलांना स्वशिक्षित करून त्यांना सक्षम करण्यासाठी स्वयंदीप प्रकल्प सुरु केला. यामध्ये आज १५० महिलांना प्रशिक्षण दिले जात आहे. यातूनच कापड व्यवसाय सुरु केला आहे.
शशिकांत पाटील म्हणाले, ‘आमच्या आयटीआयमध्ये शिक्षण घेतलेले दिव्यांग विद्यार्थी आता विविध नामवंत संस्थांमध्ये काम करीत आहेत. सध्या आमच्या संस्थेत ९३ दिव्यांग बांधवांना प्रशिक्षण दिले जात आहे. दिव्यांग बांधवासाठी असणाऱ्या शासनाच्या योजना त्यांच्यापर्यंत पोहचविण्यासाठी समाजात काम करणाऱ्या सामाजिक संस्थांना सहभागी करून घेतले पाहिजे. यामुळे दिव्यांग बांधवांच्या योजना सक्षमपणे राबविण्यास सोपे जाईल,’ असेही ते म्हणाले.


