पुणे : ‘अनुराग जाहला सीतेला’, ‘राम जानकी मिलन झाले’, ‘चित झाली मुंड्या सारी’, ‘झेप घेतली हनुमानानी’, ‘सावळी ती कांती गोजिरे ते रूप’ या रचना सादर करीत रामायणातील ज्या पात्रांवर आणि प्रसंगांवर आजपर्यंत काव्य झाले नाही, अशा प्रसंगावर आधारीत नव्या काव्यरचना ऐकण्याची संधी पेशवेकालीन तुळशीबाग राम मंदिरात पुणेकरांना मिळाली. कलाकारांनी सादर केलेल्या रचना ऐकून रसिक मंत्रमुग्ध झाले.
श्री रामजी संस्थान तुळशीबाग यांच्या वतीने श्रीमंत नारो आप्पाजी तुळशीबागवाले यांच्या पुण्यतिथी निमित्त तुळशीबाग राम मंदिरात ‘राम पर्व’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संस्थानचे कार्यकारी विश्वस्त भरत तुळशीबागवाले, डॉ. रामचंद्र तुळशीबागवाले, राघवेंद्र तुळशीबागवाले, श्रीपाद तुळशीबागवाले, रामदास तुळशीबागवाले, कोटेश्वर तुळशीबागवाले यांसह तुळशीबागवाले परिवार उपस्थित होता.
अमित गोखले यांनी नवीन काव्य निर्मिती केली असून त्याला हेमंत आठवले आणि जान्हवी गोखले यांनी संगीतबद्ध केले होते. तबल्यावर केदार तळणीकर, तालवाद्यावर अवधूत धायगुडे आणि व्हायोलिनवर वेधा पोळ यांनी उत्तम साथ केली.
नारो आप्पाजींच्या मनी पुण्यात रामाचे मंदिर असावे असे १७५८ साली आले. त्यासाठी त्यांनी खासगी वाल्यांकडून एक एकरभर पसरलेली तुळशीबाग विकत घेतली. त्यास तटबंदी बांधली आणि पेशव्यांकडे राम मंदिर बांधण्याची परवानगी मागितली. नानासाहेबांनीही मागणी मंजूर केली. मंदिराच्या बांधकामास माघ महिन्यात सुरूवात झाली. ते तुळशीबागेचे मालक झाल्यामुळे लोक त्यांना ‘तुळशीबागवाले’ म्हणून संबोधू लागले आणि त्यांचे खिरे हे आडनाव लोप पावले.
नानासाहेबांचा मृत्यू पानिपताच्या पराजयाने खचून जाऊन झाला. त्यामुळे मंदिराचे बांधकाम थांबले. थोरले माधवराव हे पेशवे झाले. त्यांनी राममंदिराचे बांधकाम १७६३ सालच्या अखेरीस पुन्हा सुरू करण्याची आज्ञा दिली. मंदिराच्या गाभाऱ्याचे बांधकाम पूर्ण झाले आणि विधिपूर्वक समारंभाने मंदिरास उंबरा बसवण्यात आला. मंदिराला १४० फूट उंच शिखर बांधण्यात आले होते. त्याला श्रीमंत नारो आप्पाजींनी सोन्याचा कळस बसवला.


