पुणे, दिनांक ३ ऑक्टोबर ः राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी पथसंचलनांचे शहरात मोठ्या प्रमाणावर स्वागत झाले. संचलन मार्गावर विविध संस्थांकडून स्वागत कमानी उभारण्यात आल्या होत्या, तर नागरिकांनीही उत्स्फूर्तपणे स्वयंसेवकांवर पुष्पवृष्टी केली. पुणे महानगरातील ५५ नगरांमध्ये ५७ स्थानांवर घोष सहित संचलने पार पडली, ज्यामध्ये २३ हजार २१८ युवा स्वयंसेवकांनी सहभाग घेतला होता.
विजयादशमीला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या करड्या शिस्तीचे प्रदर्शन घडविणारे सघोष पथसंचलने संपूर्ण देशभर आयोजित होतात. संघ सुरू होऊन १०० वर्षे झाल्याने यंदाच्या पथसंचलनांना विशेष महत्त्व होते. शताब्दी वर्षानिमित्त अधिकाधिक स्वयंसेवक गणवेशात सहभागी व्हावेत म्हणून विशेष प्रयत्न केले गेले. त्यामुळे यंदा दरवर्षीपेक्षा जास्त स्वयंसेवकांनी संचलनात सहभाग घेतल्याचे पाहायला मिळाले. विशेष म्हणजे समाजाच्या सर्वच क्षेत्रात कार्यरत स्वयंसेवक विशेष वेळ काढून सदंड गणवेशात पाहायला मिळाले. ज्यामध्ये केंद्रीय मंत्र्यांपासून ते सिने दिग्दर्शकांपर्यंत अनेक सन्माननीय व्यक्तींचा समावेश आहे.
संचलनाबरोबरच अनेक नगरांचे विजयादशमीचा शस्त्रपूजन उत्सवही पार पडले. ज्याला स्वयंसेवकांसह नागरिकांनीही प्रत्यक्ष उपस्थिती दर्शवली. यावेळी संघ शाखेवर होणाऱ्या अनेक मैदानी खेळांचे आणि उपक्रमांचे प्रात्यक्षिके सादर केली गेली. ज्यामध्ये व्यायामयोग, दंड, नियुद्ध, घोष आदींचा समावेश आहे. उत्सवासाठी प्रत्येक ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून विविध क्षेत्रातील नेतृत्वाला निमंत्रित करण्यात आले होते.
——–
(चौकट)
पंच परिवर्तनाचा उद्घोष
सामाजिक समरसता, पर्यावरण, कुटुंब प्रबोधन, नागरिक शिष्टाचार आणि स्वबोध असे पाच विषय घेऊन संघ स्वयंसेवक समाजात जाणार आहे. पंच परिवर्तनाच्या या विषयांमध्ये समाजाचा सहभाग वाढावा, म्हणून संघ स्वयंसेवक विशेष प्रयत्न करणार आहे. त्याची माहिती या उत्सवामधून देण्यात आली. स्वयंसेवकांनी अधिकाधिक समाजाभिमुख होत, परिवर्तनाचे कार्य करावे असेही वक्त्यांनी सांगितले. संघाच्या भौगोलिक वाढीकडेही यावर्षी विशेष लक्ष असणार आहे.
———–
(चौकट )
संविधान रक्षणासाठी स्वयंसेवक कटिबद्ध – वंजारवाडकर
भारताचे संविधान सर्वोपरी आहे. पण राष्ट्रबोध असल्याशिवाय त्याचे रक्षण होणार नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाचे संरक्षण करण्यासाठी संघ स्वयंसेवक कायमच संविधान रक्षणासाठी कटिबद्ध आहेत, असे प्रतिपादन पुणे महानगर संघचालक रवींद्र वंजारवाडकर यांनी केले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये आयोजित विजयादशमी उत्सवात ते बोलत होते. विद्यापीठ हायस्कूलच्या मैदानात पार पडलेल्या उत्सवाला प्रमुख पाहुण्या म्हणून राष्ट्रीय पेशी विज्ञान संस्थेच्या (एनसीसीएस) प्रभारी संचालक डॉ. शर्मिला बापट उपस्थित होत्या. कार्यक्रमापूर्वी स्वयंसेवकांचे शिस्तबद्ध संचलन विद्यापीठात पार पडले. उत्सवाला कर्मचारी, प्राध्यापक आणि संशोधकांनीही हजेरी लावली. श्री. वंजारवाडकर पुढे म्हणाले की, “आज दीड लाखाहून अधिक सेवाकार्य संघाच्या माध्यमातून देशभर चालतात. आजच्या तरुणांमध्ये राष्ट्रभाव जागृत असणे अत्यंत महत्त्वाचे आहे आणि यासाठी संघाने पंचपरिवर्तन या विषयामध्ये काम सुरू केलेलं आहे.” कर्करोगाबरोबरच त्यामुळे होणाऱ्या साईड इफेक्टवरही भारतात नव्याने संशोधन चालू झाल्याचे डॉ. बापट यांनी आपल्या वक्तव्यात सांगितले.


