Saturday, August 22, 2026
Google search engine
HomeUncategorizedकुटुंब टिकले तरच धर्म आणि राष्ट्र टिकेल – ज्येष्ठ प्रवचनकार डॉ. संजय...

कुटुंब टिकले तरच धर्म आणि राष्ट्र टिकेल – ज्येष्ठ प्रवचनकार डॉ. संजय उपाध्ये*

 

पुणे, दि. २५ मार्च : “हिंदू धर्म आणि राष्ट्र टिकवण्यासाठी कुटुंब टिकविणे काळाची गरज आहे. हिंदू धर्माचे अस्तित्व टिकवायचे असेल, तर सर्वप्रथम कुटुंब टिकवणे अत्यावश्यक आहे. कौटुंबिक व्यवस्थेचा केंद्रबिंदू असलेल्या पती-पत्नीमध्ये वैचारिक एकोपा आणि जिवंत संवाद असेल, तरच कुटुंब टिकेल. पर्यायाने समाज आणि राष्ट्र सुरक्षित राहील,” असे प्रतिपादन ज्येष्ठ प्रवचनकार डॉ. संजय उपाध्ये यांनी केले.

कोथरूड येथील परमहंस नगर परिसरात सकल हिंदू समाजाद्वारा आयोजित विराट हिंदू संमेलनानिमित्त आयोजित व्याख्यानाप्रसंगी ते बोलत होते.

उपनिषदांप्रमाणे विराट शब्दाचा अर्थ जागृत अवस्थेतील आत्मा असा आहे. त्यामुळे सध्या ठिकठिकाणी होत असलेल्या विराट हिंदू संमेलनांमधून निद्रिस्त आत्मे जागे करण्याचे काम सुरू आहे. कोणताही उत्सव, सण नसताना हिंदू एकत्र येत आहेत यातच विराटपणा आहे असे सांगत त्यांनी विराट हिंदू संमेलनांच्या आयोजनाचे महत्व अधोरेखित केले.

कोणत्याही राष्ट्राच्या जडणघडणीत शिक्षणाचे महत्त्व असते. मात्र आपल्याकडे स्वातंत्र्यानंतर अवलंबलेल्या शिक्षणपद्धतीने कुटुंबामध्ये दुरावा निर्माण केला असे सांगून ते पुढे म्हणाले, स्वातंत्र्यानंतर भारतीयांना शिक्षणातून खरंतर धर्माचे, संस्कृतीचे शिक्षण मिळायला हवे होते. मात्र आता परिस्थिती अशी आहे की जो जेवढे शिकतो तो तेवढे धर्मापासून दूर जातो. इंग्रजी माध्यमाने स्मार्ट बनवले पण धर्मापासून लांब नेले. हिंदू आहोत हे म्हणवून घ्यायला लाज वाटणार असेल तर अशा शिक्षणाचा काय उपयोग असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

हिंदू धर्माचे उदात्त तत्वज्ञान विशद करताना ते म्हणाले की, हिंदू धर्माइतके स्वातंत्र्य जगात कुठेही नाही. हिंदू धर्म हा बहुआयामी आहे. अनेकवादी आहे. हा उदात्त धर्म जगभर मांडावा लागेल. परदेशात जाणाऱ्या हिंदुंनी तिकडे हिंदू धर्माचा प्रचार केला पाहिजे. आपल्याकडे प्रत्येक व्यक्तीला धर्माचे स्वातंत्र्य आहे. प्रत्येक व्यक्ती आपापल्या श्रद्धेनुसार धर्माचरण करते. खरंतर ते उत्तम आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा बाप, ‘अभिभक्ती’ स्वातंत्र्य आपल्या धर्मात आहे. अन्य कोणाही धर्माकडे हे नाही. डार्विनच्या सिद्धांताप्रमाणे उत्क्रांतीवादाचा विचार केला तर मानवाची शेवटची आवृत्ती हिंदू आहेत. शेवटचा सर्वोत्तम माणूस कोण… तर तो भारतीय हिंदू. सनातन हिंदू. सर्वोच्च आवृत्ती. याचे कारण स्वीकृती. समोरच्याचा माणूस म्हणून स्वीकार करण्याची आपली भूमिका आहे.

जागतिक पातळीवर हिंदू समाजापुढील आव्हाने सांगताना ते म्हणाले, आज अशा हिंदू संमेलनांचे आयोजन करण्यामागील भूमिका ही संख्या विरुद्ध सांख्य अशी लढाई आहे. आम्हाला संख्येवर लक्ष द्यावे लागणार आहे. जागतिक स्तरावर इंग्लंड, सिरिया, जर्मनी, नेदरलँड्समधील अवस्था पाहिली तर लक्षात येते की, केवळ संख्येच्या जोरावर सत्तापालटाची प्रक्रिया तिकडे सुरू आहे. धर्म डोळ्यासमोर ठेवून आणि डोक्यामध्ये घेऊन ती प्रक्रिया सुरू आहे. जगभरात १३० पेक्षा अधिक ख्रिस्ती राष्ट्रे आहेत, ५५ पेक्षा अधिक मुस्लिम राष्ट्रे आहेत, ४-५ बौद्ध राष्ट्रे आहेत. पण एक हिंदूराष्ट्र म्हणून चर्चा सुरू केली की मात्र लोकांची डोकी फिरतात.

आपण सगळ्या हिंदूंना नियमित एकत्र येण्याची सवय लावायला हवी. केवळ उत्सवापुरते एकत्र येऊन भागणार नाही. हिंदू ही एक अखंड रेघ आहे हे दाखवून द्यावे लागेल. किती दिवस बिंदू बिंदू म्हणत बसणार. तिथून बदलावे लागेल. त्यासाठी आत्मपरीक्षण केल्याशिवाय पर्याय नाही. आम्हाला ज्या व्यापकतेवरती विचार करायचा आहे हिंदू म्हणून, ते करत असताना हे कणाकणाने एकत्र येण्याची जी प्रक्रिया आहे ती प्रत्येक व्यक्तीपासून मनातल्या मनात सुरू करावी लागेल. त्यासाठी आपल्या घरापासून सुरूवात करावी लागेल. विराट शब्दाकडे जाताना तिथून सुरूवात करावी लागेल. व्यक्ती, कुटुंब, समाज, राष्ट्र आणि विश्व या पाचही स्तरांवरती हिंदुत्व काय पद्धतीने व्यक्त होते हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे अशी भूमिका उपाध्ये यांनी मांडली.

 

संमेलनाच्या सुरुवातीला श्री साईप्रसाद भजनी मंडळाने कलाप्रस्तुती केली. रांजणगाव जवळच्या किष्किंधा गुरुकुलाची माहिती, एकात्मता स्तोत्राची ध्वनिचित्रफीत यावेळी दाखवण्यात आली. संमेलनाचे आयोजक दिलीप चोरघे यांनी प्रास्ताविक केले. सुनील ढोले यांनी सूत्रसंचालन केले. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी लिहिलेल्या छत्रपती शिवरायांच्या आरतीने कार्यक्रमाची सांगता झाली.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments