पुणे : जगातील सर्वांत यशस्वी विद्यार्थी म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचे उदाहरण देता येईल. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या जडणघडणीत लोककला व साहित्याची महत्त्वपूर्ण भूमिका होती. विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्वही त्यांच्याप्रमाणे घडवायचे असेल, तर लोककला आणि साहित्याचा शैक्षणिक अभ्यासक्रमात समावेश कसा करता येईल, याबाबत चिंतन होणे आवश्यक आहे. आजच्या काळात विद्यार्थ्यांचे मनोबल बळकट करण्याचीही गरज असून, लोककला व साहित्याचा शैक्षणिक अभ्यासक्रमात समावेश केल्यास विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थाने आत्मनिर्भर बनविता येईल, असे मत शिक्षण प्रसारक मंडळी, पुणे नियामक मंडळाचे अध्यक्ष सुधीर काळकर यांनी व्यक्त केले.
शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी, सेवा मित्र मंडळ आणि ठाकूर परिवाराच्या वतीने ज्येष्ठ शिक्षक व शाहीर कै. शशिकांत ठाकूर यांच्या स्मरणार्थ दरवर्षी ‘लोकशिक्षक पुरस्कार’ सोहळ्याचे आयोजन केले जाते. यंदाचा १९वा ‘लोकशिक्षक पुरस्कार’ त्र्यंबकेश्वर प्रतिष्ठान, कसबे पुणे येथील मर्दानी आखाड्याचे वस्ताद विनोददादा आढाव यांना त्यांच्या राहत्या घरी प्रदान करण्यात आला. यावेळी सामाजिक कार्यकर्ते आनंद सराफ, प्रबोधिनीचे अध्यक्ष आचार्य शाहीर हेमंतराजे मावळे , महाराष्ट्र राज्य ढोल-ताशा महासंघाचे अध्यक्ष पराग ठाकूर, सेवा मित्रमंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ महाडिक, शिरीष मोहिते, उदय जगताप, पुष्कर औरंगाबादकर, अरुणकुमार बाभुळगावकर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी विनोद आढाव यांच्या दाराला तोरण बांधून, घरासमोर रांगोळी व सनई -चौघड्याचे वादन करण्यात आले.
पराग ठाकूर म्हणाले, पैशासाठी कला विकणारे अनेक जण आपण पाहिले आहेत; मात्र कला जिवंत ठेवून त्यातून पैसे कमावणारे फारच कमी आहेत. अशांपैकी एक नाव म्हणजे विनोद आढाव. शिवकालीन कला टिकवणे, तिचे जतन व संवर्धन करणे आणि ती वर्धिष्णू करण्याचे कार्य विनोद आढाव करीत आहेत. ते केवळ या कलेचे प्रशिक्षण देत नाहीत, तर आजच्या काळातील कोणत्याही आव्हानाला समर्थपणे तोंड देणारी पिढी घडवत आहेत. सैन्याला पूरक असे कार्य ते करीत असून, त्यांच्या या कार्यातून कलेसोबतच देशासाठी सक्षम पिढी घडविण्याचे काम होत आहे, असेही त्यांनी सांगितले.
पुरस्कारार्थी विनोद आढाव म्हणाले, मी कधीही बोलण्यासाठी पुढे उभा राहिलो नाही; मात्र माझ्या कार्यातून मी माझे विचार मांडले आहेत. माझ्या या कार्याची पोहोचपावती आज मला या पुरस्काराच्या रूपाने मिळाली आहे, याचे मी भाग्य समजतो. शाहीर हेमंतराजे मावळे यांनी सूत्रसंचालन केले. शिरीष मोहिते यांनी आभार मानले
.


