पुणे, दि. ११ : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राज्यात मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत दावे व हरकती सादर करण्याचा कालावधी ३१ ऑगस्ट ते ३० सप्टेंबर २०२६ असा निश्चित करण्यात आला आहे. या कालावधीत नवीन मतदार नोंदणी, मतदार यादीतील नोंदींची दुरुस्ती तसेच नाव वगळण्यासाठी नागरिकांना अर्ज करता येणार आहेत. या अनुषंगाने पुणे जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर शनिवार व रविवारी १९, २०, २६ व २७ सप्टेंबर २०२६ रोजी विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे.
विशेष सखोल पुनरीक्षणाच्या प्रारूप मतदार यादीमध्ये अनेक मतदारांची नावे गैरहजर, स्थलांतरित किंवा अन्य कारणांमुळे समाविष्ट होऊ शकलेली नाहीत. अशा मतदारांना त्यांच्या सध्याच्या सर्वसाधारण रहिवासाच्या ठिकाणाहून मतदार यादीमध्ये नव्याने नाव समाविष्ट करण्यासाठी दावे व हरकतींच्या कालावधीत संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच १ ऑक्टोबर २०२६ रोजी किंवा त्यापूर्वी १८ वर्षे पूर्ण झालेल्या नवमतदारांना मतदार यादीमध्ये नाव नोंदविण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
नवमतदार तसेच प्रारूप मतदार यादीमध्ये नाव समाविष्ट न झालेल्या पात्र नागरिकांनी मतदार यादीत नाव नोंदणी, अस्तित्वातील नोंदीमध्ये सुधारणा किंवा नाव वगळण्यासाठी या विशेष शिबिरांचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
महिला, दिव्यांग, तृतीयपंथी, अल्पसंख्याक तसेच इतर पात्र नागरिकांचा मतदार यादीतील सहभाग वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार आहेत. या विशेष शिबिरांसाठी नियुक्त केलेले मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) संबंधित मतदान केंद्रावर १९, २०, २६ व २७ सप्टेंबर रोजी सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत उपस्थित राहणार आहेत. त्यांच्यासोबत मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधीही उपस्थित राहणार असून नागरिकांनी आवश्यक कागदपत्रांसह शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन उपजिल्हा निवडणूक अधिकारी मिनल कळसकर यांनी केले आहे.
000


