पुणे, दि. १७ (जिमाका वृत्तसेवा) : चाकण परिसरातील वाढती वाहतूक कोंडी, औद्योगिक वाहनांची वाढती वर्दळ, रस्त्यांवरील खड्डे आणि अनधिकृत वाहनतळांच्या प्रश्नावर कायमस्वरूपी उपाययोजनांसाठी विविध विभागांनी समन्वयाने कृती आराखडा तयार करून त्याची टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले. रस्ते दुरुस्तीबरोबरच प्रमुख चौकांचे वाहतूक नियोजन, जड वाहनांसाठी पर्यायी मार्ग, वाहनतळांची व्यवस्था आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून वाहतूक नियंत्रणावर विशेष लक्ष देण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयात चाकण परिसरातील रस्ते व वाहतूक व्यवस्थेबाबत उच्चस्तरीय आढावा बैठक झाली. यावेळी आमदार बाबाजी काळे, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभाग, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, वाहतूक पोलीस, स्थानिक प्रशासनाचे अधिकारी तसेच चाकण परिसरातील नागरिक उपस्थित होते.
चाकण, तळेगाव, बोराटे वस्ती आणि भोसरी परिसरातील जोडरस्त्यांवरील खड्डे तातडीने बुजवून रस्ते वाहतुकीसाठी सुरळीत करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डुडी यांनी दिल्या. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रलंबित रस्ते कामांना प्राधान्य देऊन ती निर्धारित कालावधीत पूर्ण करावीत. जिल्हा परिषदेच्या अखत्यारीतील रस्त्यांचाही आढावा घेऊन आवश्यक दुरुस्तीची कार्यवाही करावी, असे त्यांनी सांगितले.
वाहतूक नियंत्रणासाठी पारंपरिक उपाययोजनांसोबत कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर भर देण्यात आला. प्रमुख चौकांवरील निरीक्षण कॅमेऱ्यांचा वापर केवळ वाहतुकीवर लक्ष ठेवण्यासाठी न करता वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर थेट दंडात्मक कारवाईसाठी करावा. आवश्यकतेनुसार वाहतूक पोलिसांना स्थिर तसेच फिरते निरीक्षण कॅमेरे उपलब्ध करून द्यावेत, असे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.
चाकण चौकासह परिसरातील प्रमुख चौकांचे स्वतंत्र सर्वेक्षण करून वाहतुकीचा प्रवाह आणि पादचारी सुरक्षेचा विचार करून सुधारित आराखडा तयार करावा. आवश्यकतेनुसार उन्नत पादचारी मार्ग, भुयारी मार्ग, वाहतूक बेटे तसेच सुरक्षित वळणमार्ग याबाबत तांत्रिक अभ्यास करावा, असेही त्यांनी सांगितले.
रस्त्यांवरील अनधिकृत वाहनतळांविरोधात टोईंग वाहनांच्या माध्यमातून वाहने हटविणे, दंड आकारणे तसेच आवश्यकतेनुसार गुन्हा दाखल करण्याची कारवाई करावी, अशा सूचना देण्यात आल्या. औद्योगिक कंपन्या आणि वाहतूक संघटनांच्या वाहनांसाठी स्वतंत्र वाहनतळ अथवा थांबा व्यवस्था उपलब्ध करून देण्याची जबाबदारी संबंधित कंपन्यांनी घ्यावी. परिसरातील उपलब्ध मोकळ्या जागांचा शोध घेऊन वाहनतळांची व्यवस्था करावी तसेच वाहनतळांवर प्रत्यक्ष वेळेतील देखरेख व्यवस्था विकसित करावी, असे जिल्हाधिकारी डुडी यांनी सांगितले.
चाकण-शिक्रापूर मार्गावरील रस्ते सुधारणा कामे टप्प्याटप्प्याने करण्यात येणार असल्याने प्रत्यक्ष काम सुरू होण्यापूर्वी आवश्यक पूर्वतयारी आणि वाहतूक नियोजन पूर्ण करावे. जड वाहनांसाठी लांबचा पर्यायी मार्ग निश्चित करावा, तर हलक्या वाहनांसाठी आवश्यकतेनुसार एकेरी वाहतूक व्यवस्था करण्याचे नियोजन करावे, असे त्यांनी सांगितले. रस्ते कामांच्या ठिकाणी भारतीय रस्ते मानकांनुसार सुरक्षिततेच्या उपाययोजना कराव्यात. कामाच्या ठिकाणापासून दोन ते तीन किलोमीटर आधी दिशादर्शक फलक आणि वाहतूक मार्गांचे नकाशे लावावेत तसेच आवश्यकतेनुसार सुरक्षा सल्लागार नियुक्त करावा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
अतिक्रमण हटविल्यानंतर रस्त्यावरील विद्युत खांब आणि तारा हलविण्याची कामे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने परस्पर समन्वयाने तातडीने पूर्ण करावीत. प्रत्येक विभागाने आपल्या अखत्यारीतील कामे, त्यासाठीची कालमर्यादा आणि जबाबदारी निश्चित करावी तसेच कामाच्या प्रगतीचा नियमित आढावा घ्यावा, असे निर्देश जिल्हाधिकारी डुडी यांनी दिले.
यावेळी चाकण परिसरातील नागरिकांनी वाहतूक, रस्ते, वाहनतळ आणि इतर पायाभूत सुविधांशी संबंधित प्रश्न मांडले. नागरिकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांबाबत प्रशासनामार्फत करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती जिल्हाधिकारी डुडी यांनी दिली.


