पुणे : विश्वास आणि श्रद्धा यामध्ये खूप कमी अंतर आहे. माता पार्वती श्रद्धा आहे, तर भगवान शंकर विश्वास आहेत. जीवनात विश्वास आणि श्रद्धा याचे मिलन होणार नाही, तोपर्यंत जीवनात भक्तीची धारा प्रकट होणार नाही. भक्ती प्रकट करण्याकरिता विश्वास आणि श्रद्धा यांचा अंतर्भाव असणे गरजेचे आहे, असे पूज्य राजन जी महाराज यांनी सांगितले.
श्री गौड ब्राह्मण समाज, श्री चारभुजानाथ मंदिर राम कथा समितीतर्फे श्रीराम कथा प्रेम यज्ञ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. चित्रकूट धाम, वर्धमान लॉन्स समोर, बिबवेवाडी कोंढवा रस्ता येथे आयोजित कथा सोहळ्यात दुसऱ्या दिवशी प्रेममूर्ती पूज्य संत श्री प्रेमभूषणजी महाराज यांचे कृपापात्र पूज्य राजन जी महाराज यांनी निरूपण केले.
पूज्य राजन जी महाराज म्हणाले, भक्तांचे हीत करण्याकरिता भगवान श्रीराम यांनी भूमीवर अवतार घेतला. विश्वास आणि श्रद्धा याचे अनन्यसाधारण महत्व असून माणसाकडील श्रद्धारुपी पुंजी संपली की तो संत चरणापासून दूर होतो. विनाश जवळ आला की मोठ्या व्यक्तींनी सांगितलेल्या गोष्टी देखील लक्षात येत नाहीत. त्यामुळे संत सज्जनांनी सांगितलेल्या गोष्टी नेहमी ऐकत, त्याचा अवलंब करायला हवा.
ते पुढे म्हणाले, संतांची भूमी असलेल्या महाराष्ट्रातील पुण्यात ही कथा होत आहे. कथा माणसाच्या व्यथेचे हरण करते, ही कथेची महिमा आहे. परमेश्वराच्या कथेत मन रमले, तर ती कथा ऐकणाऱ्या व्यक्तीला बांधून ठेवते. याचा अनेकदा प्रत्यय येतो. तसेच यामुळे त्या कथेतील सार आणि संदेश ऐकणाऱ्यापर्यंत पूर्णपणे पोहोचतो, असेही त्यांनी सांगितले.
कथा सोहळ्याचे आयोजन दि. २२ डिसेंबर पर्यंत दररोज दुपारी ३ ते सायंकाळी ७ यावेळेत चित्रकूट धाम, वर्धमान लॉन्स समोर, बिबवेवाडी कोंढवा रस्ता येथे करण्यात आले आहे. श्रीराम कथा प्रेमयज्ञ सोहळ्यात श्रीराम जन्म उत्सव, श्री बाल लीला, श्री सीताराम विवाह महोत्सव, श्री केवट प्रेम, श्री राम मंगल यात्रा, श्री भरत चरित्र, श्री शबरी प्रेम, सुंदरकाण्ड आणि श्री राम राज्याभिषेक याविषयी पूज्य राजनजी महाराज हे निरूपण करीत आहेत. सोहळ्याकरिता प्रवेश विनामूल्य असून रामभक्तांनी मोठया संख्यने सहभागी व्हावे, असे आवाहन समितीतर्फे करण्यात आले आहे.


