*
पनवेल दि. 3:- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्य शासनाने शंभर दिवसांची कार्यालयीन सुधारणा संदर्भात एक विशेष अभियान राबवले होते. यात राज्यातील महानगरपालिका गटामध्ये सहभाग नोंदवत पनवेल महानगरपालिकेने उल्लेखनीय कार्याबद्दल राज्यात तिसरा क्रमांक मिळविला आहे. 1 मे महाराष्ट्र दिनी याबाबतचा निकाल जाहीर झाला आहे.
महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली मनपा ने विविध पथदर्शी तसेच लोकाभिमुख उपक्रम राबविले आहेत. त्यामुळेच हे यश मिळाले.
या बद्दल बोलताना श्री. चितळे म्हणाले, पनवेल महानगरपालिकेच्या सर्वांगीण विकासासाठी केलेल्या कामाची दखल शासनाने घेतली आहे. यापुढे महानगरपालिकेच्या कामात अधिक सुधारणा घडवून पनवेल शहराचे नाव वृद्धिंगत करण्याचा प्रयत्न महानगरपालिकेकडून होणारच आहे. महानगरपालिकेला मिळालेले कोणतेही यश,येथील नागरिकांचेच असते. या पारितोषिक बद्दल श्री. चितळे यांनी पनवेलच्या सर्व नागरिकांचे विशेष अभिनंदन केले, तसेच ज्या महानगरपालिकांना पारितोषिक मिळाले त्यांचेही अभिनंदन केले.
भारतीय गुणवत्ता परिषदेतर्फे १०० दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमाचे अंतिम मूल्यमापन करण्यात आले होते. यामध्ये वेबसाईट सुधारणा, कार्यालयीन सोयी-सुविधा, तक्रार निवारणा, सुलभ जीवनमान, गुंतवणूक चालना तसेच तंत्रज्ञानाचा वापर अशा विविध 17 मुद्द्यांवर गुणांकन करण्यात आले होते.यामध्ये सर्वोत्तम महापालिका आयुक्त विभागात पनवेल पालिकेचे आयुक्त तथा प्रशासक मंगेश चितळे यांनी १०० पैकी ७९.४३ गुण प्राप्त करून सर्वोत्तम आयुक्तांच्या यादीत राज्यात पालिकेचा तिसरा क्रमांक आला आहे.
चौकट
नागरिकांना लोकाभिमुख, पारदर्शी व उत्तरदायी प्रशासन देण्याच्या अनुषंगाने पनवेल पालिका सातत्याने प्रयत्नशील आहे. मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या १०० कार्यालयीन सुधारणा मोहिमेअंतर्गत पनवेल पालिकेने नागरिकांच्या तक्रारी त्वरित आणि योग्य पद्धतीने निवारण करण्याच्या दृष्टीने विविध उपक्रम सुरू केले आहेत. या स्पर्धेत यशस्वी होण्यासाठी महापालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांरी विशेष मेहनत घेतली. यापुढेही गतिमान प्रशासन करण्याच्या दृष्टीने अशाच प्रकारे सातत्य टिकविण्यासाठी महापालिका कटिबध्द राहिल.
*- मंगेश चितळे,आयुक्त तथा प्रशासक, पनवेल महानगरपालिका*


