पुणे, १७ जानेवारी २०२४ : भारताला विकसनशील राष्ट्रापासून ते विकसित राष्ट्र हे परिवर्तन पाहण्याची आणि त्यात योगदान देण्याची युवा पिढीला मोठी संधी आहे व या परिवर्तनात त्यांनी महत्वाची भूमिका बजवावी असे आवाहन राज्यपाल रमेश बैस यांनी येथे केले. अजिंक्य डीवाय पाटील विद्यापीठाचा (एडीवायपीयू) आठवा पदवीदान समारंभ मंगळवारी सायंकाळी पार पडला. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल रमेश बैस उपस्थित होते. याप्रसंगी अजिंक्य डीवाय पाटील विद्यापीठाचे अध्यक्ष डॉ.अजिंक्य डीवाय पाटील,अजिंक्य डी.वाय.पाटील समूहाच्या अध्यक्ष पूजा पाटील आणि कुलगुरु प्रा. हृदयेश देशपांडे आदी मान्यवर उपस्थित होते.
या भव्य पदवीदान समारंभात उद्योजकता, कायदा, राष्ट्रीय सुरक्षा, चित्रपट, व्यवसाय आणि सामाजिक या विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणार्या व्यक्तींना डॉक्टर ऑफ लेटर्स – होनारिस कौसा (डी.लीट.) प्रदान करण्यात आली. त्यामध्ये शिक्षणतज्ञ व सामाजिक उद्यमशीलतेचे प्रवर्तक भरत अमळकर,द भारत टेट्रालॉजीचे लेखक व सर्वोच्च न्यायालयातील काऊंसेल जे. साई. दीपक, रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ ग्रेट ब्रिटनचे अध्यक्ष रॉबर्ट वॉल्टन एमबीई, संरक्षण मंत्रालयाचे मुख्य सल्लागार लेफ्टनंट जनरल विनोद खंदारे (निवृत्त) आणि भारतीय चित्रपट निर्माता विवेक रंजन अग्निहोत्री यांचा समावेश होता.
याप्रसंगी बोलताना राज्यपाल रमेश बैस म्हणाले की, चांद्रयान मिशन, सूर्य मिशन, आशियाई आणि इतर क्रीडांमध्ये भारताला यश मिळाल्यामुळे भारतीयांचा आत्मविश्वास वाढला असून त्यांच्यामध्ये कोणत्याही क्षेत्रात यश संपादन करण्याची भावना निर्माण झाली आहे. हीच भावना युवकांनी आपल्या हृदयात ठेवावी आणि संपत्तीचे निर्माते आणि स्टार्टअप्सचे प्रवर्तक व्हावे
ते पुढे म्हणाले की, देशाच्या राजकीय आणि आर्थिक स्थिरतेसाठी सर्वसमावेशक विकासाची आवश्यकता आहे ज्याचा फायदा सर्वांना होणे गरजेचे आहे, विशेषत: गरीब लोकांना. या संदर्भात त्यांनी एडीवायपीयू सारख्या विद्यापीठांना एक गाव दत्तक घेण्याचे आणि गावाच्या प्रगतीमध्ये विद्यार्थ्यांना सहभागी करून घेण्याचे आवाहन केले, जेणे करून विद्यार्थी संवेदनशील नागरिक बनतील.
अजिंक्य डीवाय पाटील विद्यापीठाचे अध्यक्ष डॉ.अजिंक्य डीवाय पाटील म्हणाले की, नाविन्यपूर्ण शिक्षण, संशोधन ,अध्यापन आणि शिक्षणात उत्कृष्टतेसाठी निरंतर प्रयत्नांच्या माध्यमातून सकारात्मक प्रभाव पाडत आहे. विद्यापीठाने एक महत्त्वाकांक्षी पायाभूत सुविधा विकास योजना हाती घेतली आहे जी विद्यार्थी आणि संशोधनासाठी जागतिक दर्जाच्या सुविधा निर्माण करेल. गुंतागुंतीच्या व अनिश्चितेने (व्हीयुसीए -वोलॅटिलिटी, अन्सर्टएन्टी, कॉम्प्लेक्स सीटी आणि अँबिग्विटी) भरलेल्या जगात विद्यार्थ्यांना सज्ज करण्यासाठी, त्या त्या क्षेत्रातील विशिष्ट कौशल्यांप्रमाणेच जीवन कौशल्यांवर लक्ष केंद्रित करत आहोत. शिक्षणामध्ये भारतीय ज्ञान प्रणाली समाविष्ट करून भारताला जगाशी जोडण्याकरिता आम्ही प्रयत्न करीत आहोत.
आपल्या स्वागतपर भाषणात कुलगुरु प्रा. हृदयेश देशपांडे यांनी विद्यापीठाचा अहवाल सादर केला. त्यांनी विद्यापीठात सुरू केलेल्या स्पेस टेक्नॉलॉजी, डिजिटल हेल्थ टेक्नॉलॉजी आणि बहुआयामी उपक्रमांवर प्रकाश टाकला. विद्यार्थी आणि प्राध्यापकांच्या उपयुक्ततेसाठी गतिशीलता वाढवण्यासाठी विद्यापीठाने वर्षभरात केलेल्या अनेक आंतरराष्ट्रीय सहयोगाचा उल्लेख त्यांनी केला. एडीवायपीयूचे पदवीधारक हे योग्य कौशल्य आणि ज्ञानासह उद्योगात काम करण्यासाठी सज्ज असतात व उद्योगात योगदान देत आहेत याचा आम्हाला अभिमान आहे .
या पदवीदान समारंभात मॅनेजमेंट, डिझाइन, अभियांत्रिकी,लॉ, वास्तुकला, हॉटेल मॅनेजमेंट, फिल्म अँड मीडिया यासह 13 मार्स्टर्स अभ्यासक्रम आणि 23 पदवी अभ्यासक्रमातील 852 विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. यामध्ये पाच पीएच.डी.धारकांच्या पहिल्या बॅचचा समावेश आहे जे एडीवायपीयूच्या संशोधन आधारित अभ्यासक्रमांसाठी कटिबद्धता दर्शविते. या पदवीदान समारंभात शैक्षणिक उत्कृष्टतेसाठी विविध अभ्यासक्रमातील 159 विद्यार्थ्यांना सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदके देऊन गौरविण्यात आले.


