पुणे, दि. १८ : आंतरविद्यापीठ राज्यस्तरीय विद्यार्थी संशोधन व नवसंकल्पना महोत्सव ‘आविष्कार २०२४’ मध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संघास उपविजय प्राप्त झाला असून त्यामध्ये महर्षी कर्वे स्त्रीशिक्षण संस्थेच्या डॉ. भानूबेन नानावटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर फॉर वूमेनच्या (बीएनसीए) दोन विद्यार्थिनींच्या दोन संशोधन प्रकल्पांचाही समावेश आहे. शिवाली लालबिगे व तनया टकले अशी त्यांची नावे असून त्यांनी अनुक्रमे ‘बंद पडलेल्या दगडी खाणींच्या सहअस्तित्त्वाचा वापर पुणे शहरातील पर्यावरणाशी जोडून घेणे’ आणि ‘टाकाऊ कापडाच्या धाग्यातून बांधकामासाठी त्रिमिती छपाईतून मातीच्या विटांची निर्मिती’ हे प्रकल्प स्पर्धेत सादर केले. त्यांनाही पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ४८ विद्यार्थ्यांच्या संघाने त्याचे सादरीकरण नाशिक येथे केले. या संघाचे नेतृत्त्व सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे प्रा. डॉ. संजय ढोले यांनी केले. या स्पर्धेत महाराष्ट्रातील २४ विद्यापीठांमधील संघांनी सहभाग घेतला होता.
स्पर्धेतील शिवालीच्या प्रकल्पासाठी बीएनसीएचे प्राचार्य डॉ. अनुराग कश्यप आणि भूशास्त्रकला विभागप्रमूख डॉ. स्वाती सहस्रबुद्धे तर तनयाच्या प्रकल्पासाठी डॉ. वैशाली अनगळ यांचे मार्गदर्शन लाभले. यासाठी बीएनसीएतील विविध विभागांमधून निवडण्यात आलेल्या १६० विद्यार्थिनींमधून शिवाली आणि तनयाची निवड करण्यात आली. त्यासाठी बीएनसीए संशोधन मुख्यालय व नाविन्यपूर्ण संकल्पना केंद्राचा (इनोव्हेशन सेंटर) ह्यांचा सक्रीय सहभाग असल्याचे बीएनसीएतील अकादमिक प्रमूख डॉ. शुभदा कमलापूरकर यांनी सांगितले. शिवाली व तनया यांचे प्राचार्य डॉ. कश्यप यांनी अभिनंदन केले.
बीएनसीएमध्ये भूशास्त्रकला विभागात पदव्यूत्तर अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या शिवालीने पुणे शहरांमधील सर्व १५ बंद असणाऱ्या दगडी खाणींचा अभ्यास केला असून त्यापैकी ५० टक्के खाणींमध्ये पाणी साचले असून त्याचा निसर्गसंवर्धन व पर्यावरण वाढीसाठी उपयोग करून घेता येईल.
बीएनसीएमध्ये चौथ्या वर्षात शिकणाऱ्या तनयाने तिच्या संशोधनात टाकाऊ असणारे घरगुती व शिंप्याकडील कॉटन व रेशमी कापड व कपडे वेगळे करून त्याच्या धाग्यांचा वापर लाल व नदीतील वाळूच्या प्रमाणबद्ध मिश्रणातून रोबोटचा वापर करून विटा छापल्या. या विटा बीएनसीएतील रोबोटीक आर्म असणाऱ्या थ्रीडी प्रिंटिंग यंत्रातून छापण्यात आल्या होत्या. सध्या बांधकामासाठी वापरण्यात येणाऱ्या विटांपेक्षा त्या वजनाने हलक्या तसेच आर्थिक दृष्ट्याही परवडणाऱ्या
आहेत.


