पुणे,16 डिसेंबर 2024 : परिमल व प्रमोद चौधरी फाऊंडेशन (पीपीसीएफ) तर्फे नुकतेच कोथरूड येथील एमईएस सभागृहामध्ये उत्कर्ष संमेलन 2024 चे आयोजन करण्यात आले होते.गरजू विद्यार्थ्यांसाठी फाऊंडेशन ने सुरू केलेल्या फेलोशिप उपक्रमाचा आढावा घेण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.याप्रसंगी व्यवस्थापन तज्ञ व प्रमुख पाहुणे डॉ.संजय रुणवाल,प्राज इंडस्ट्रीजचे अध्यक्ष प्रमोद चौधरी व प्राज फाऊंडेशनच्या व्यवस्थापकीय विश्वस्त सौ.परिमल चौधरी उपस्थित होते.यावेळी परिमल व प्रमोद चौधरी फाऊंडेशनच्या संकेतस्थळाचे अनावरण प्रमोद चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले. सुरू असलेल्या फेलोशिपमध्ये उच्च माध्यमिक, कनिष्ठ महाविद्यालय आणि व्यावसायिक अभ्यासक्रमात उत्कृष्टता दर्शविणाऱ्या १५ विद्यार्थ्यांचा गौरव या कार्यक्रमात करण्यात आला. याशिवाय गरजू विद्यार्थ्यांना ओळखून फाऊंडेशनला त्यांच्यापर्यंत पोहचविण्यास मदत करणाऱ्या ९ संस्थांचा देखील सत्कार करण्यात आला.
प्रमुख पाहुणे डॉ.संजय रूणवाल म्हणाले की,पीपीसीएफ चे कार्य समाजाकरिता योगदान देण्यासाठी सर्वांना प्रेरित करेल. समाजासाठी काम करणे म्हणजे फक्त आर्थिकरित्या मदत करणे नव्हे तर आपण आपला अनुभव कुशलता,शिक्षण आणि नैपुण्यतेच्या माध्यमातून लोकांची मदत करू शकतो.प्रत्येकाकडे ही वैशिष्ट्ये कमी अधिक प्रमाणात असतात आणि त्यामुळे आपण सर्व समाज आणि राष्ट्रासाठी योगदान देऊ शकतो.
ते पुढे म्हणाले की, आजच्या काळात तरूणांना अनन्यसाधारण संधी असून त्यांना मोठी स्वप्ने बघण्यापासून कुणी दूर ठेऊ शकत नाही.
सौ.परिमल चौधरी म्हणाल्या की, शिक्षण हे आपल्या आयुष्यातील यशाची पहिली पायरी आहे.शिक्षणामुळे सर्वांना समान संधी उपलब्ध होतात.त्यामुळे शिक्षण हे सर्वांना मिळाले पाहिजे आणि आपण सर्वांनी एकत्ररित्या याकरिता प्रयत्न करायला हवेत.
परिमल व प्रमोद चौधरी फाऊंडेशन ने चार वर्षांपूर्वी, शिक्षणाची आवड असणाऱ्या आणि आर्थिक मागासलेल्या विद्यार्थ्यांना ‘लवकरात लवकर स्वत:च्या पायावर उभे राहून कुटुंबासाठी अर्थार्जन करणे सुकर व्हावे’ यासाठी आर्थिक मदत म्हणून फेलोशिप देण्याचे ठरविले. अत्यंत हुशार विद्यार्थ्यांना निरनिराळ्या शिष्यवृत्ती मिळतात.परंतु मनापासून शिकावे असे वाटणाऱ्या आणि 50% व त्यापेक्षा अधिक गुण असणाऱ्या विद्यार्थ्यांना पीपीसीएफ तर्फे फेलोशिपची संधी देण्यात आली आहे. 2021 सालापासून पीपीसीएफच्या वतीने पुण्यापासून 100 किलोमीटर परिसरातील शाळा,महाविद्यालये, व व्यावसायिक शिक्षण देणाऱ्या संस्था, औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये हा उपक्रम राबवला जातो. या संस्थांमधून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना, ठरविलेल्या निकषांवर आधारित पात्रता फेरीतून जावे लागते. त्याचबरोबर, प्रत्यक्ष घरी जाऊन ह्या विद्यार्थ्यांची कौटुंबिक व आर्थिक परिस्थिती पाहिली जाते. पात्र विद्यार्थ्यांचे संपूर्ण शैक्षणिक शुल्क भरण्याची जबाबदारी पीपीसीएफ घेते. यामुळे विद्यार्थ्यांना विनाकाळजी आपल्या शिक्षणाकडे लक्ष केंद्रित करता येते.
नुकत्याच पार पडलेल्या उत्कर्ष संमेलनातून ह्या उपक्रमाचा आढावा घेण्यात आला. आजपर्यंत एकूण 125 संस्थांमधील 2593 इतक्या विद्यार्थ्यांना ही फेलोशिप देण्यात आली आहे. यात मुलींचे प्रमाण साधारण 60% इतके आहे.व्यावसायिक शिक्षण घेतलेल्या 728 विद्यार्थ्यांपैकी 111 विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रम पूर्ण केला असून ते नोकरी करून आता त्यांच्या कुटुंबाचा आर्थिक भार उचलत आहेत. त्यांचे हे कर्तृत्व हीच पीपीसीएफच्या कार्याची खरी पावती आहे.


