पुणे, दि. १७ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेअंतर्गत पुणे जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांना प्रमाणपत्र व ओळखपत्र, मंजूर कर्जाचे मंजुरीपत्र तसेच टूलकिटचे वितरण करण्यात आले. निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांच्या हस्ते लाभार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.
जिल्हाधिकारी कार्यालयात महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, पुणे यांच्या वतीने आयोजित या लाभार्थी मेळाव्यास उपायुक्त अर्चना कोठारी, जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी रमेश सुरुंग, अधीक्षक समीर महाजन, विश्वजित आसवे, जिल्हा अग्रणी बँक अधिकारी योगेश पाटील, जिल्हा कौशल्य विकास अधिकारी सुरेश वऱ्हाडे, सुकाणू समिती सदस्य धर्मेंद्र खांडरे, विकास जगताप, हरीश परदेशी, राज्य समन्वय अधिकारी अभय रावेतकर, रविंद्र शेवते, अनंत कदम, अमर राऊत आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला हातकागद संस्था संचालक अमर राऊत यांनी खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या स्थापनेमागील उद्देश व कार्यविस्ताराची माहिती दिली. देशाच्या आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी ग्रामोद्योग महत्त्वाची भूमिका बजावत असून, सकल देशांतर्गत उत्पादनात सूक्ष्म व लघु उद्योगांचा सुमारे ४० टक्के वाटा असल्याचे त्यांनी सांगितले. प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेसाठी खादी व ग्रामोद्योग मंडळ नोडल एजन्सी म्हणून कार्यरत असून, योजनेच्या अंमलबजावणीत महाराष्ट्र देशात दुसऱ्या क्रमांकावर असल्याचेही त्यांनी नमूद केले.
पारंपरिक कारागीर व हस्तकला व्यावसायिकांना कौशल्य प्रशिक्षण, आधुनिक टूलकिट, कर्ज सुविधा आणि बाजारपेठ उपलब्ध करून देऊन त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना राबविण्यात येत आहे. यावेळी लाभार्थ्यांना योजनेअंतर्गत उपलब्ध विविध सुविधांची माहिती देण्यात आली.
यावेळी रश्मी रविंद्र देसाई आणि तानाजी आवारे यांना योजनेचे प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच त्यांना प्रत्येकी एक लाख रुपयांच्या मंजूर कर्जाचे मंजुरीपत्र प्रदान करण्यात आले. योजनेचा लाभ घेतल्यानंतर व्यवसायात वाढ झाल्याचे त्यांनी मनोगतात सांगितले.
लता ढोरे, विनोद थोरात, अनिल रसाळ, स्वर्णा जाधव, विठ्ठूबा बोरकर, विठ्ठल सदाशिव पवार आणि प्रवीण हमीन नदाफ यांना योजनेचे प्रमाणपत्र व ओळखपत्र देण्यात आले. रेखा प्रेम भुटाणा यांना एक लाख रुपयांच्या मंजूर कर्जाचे मंजुरीपत्र प्रदान करण्यात आले.
प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना कर्ज सुविधेसोबत आवश्यक टूलकिटचेही वितरण करण्यात येते. योजनेअंतर्गत देण्यात येणारे प्रमाणपत्र व ओळखपत्र देशभरात ग्राह्य असून, लाभार्थ्यांना योजनेचे विविध लाभ देशातील कोणत्याही ठिकाणी घेता येतात, अशी माहिती यावेळी देण्यात आली.
पुणे जिल्ह्यात ८ हजार ६७४ अर्ज जिल्हा समितीने पात्र ठरवून शिफारस केली आहे. तसेच सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग विभागामार्फत ७ हजार ६८६ अर्ज प्राथमिक प्रशिक्षणासाठी पुढे पाठविण्यात आले आहेत. यापैकी ६ हजार २९६ लाभार्थ्यांचे प्राथमिक प्रशिक्षण पूर्ण झाले असून, आतापर्यंत ३ हजार ६१७ लाभार्थ्यांना टूलकिटचे वाटप करण्यात आले आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनंत कदम यांनी केले. रविंद्र शेवते यांनी आभार मानले. कार्यक्रमास खादी व ग्रामोद्योग मंडळाचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.


