पुणे : महाविद्यालयीन शिक्षण केवळ अभ्यासक्रमापुरते मर्यादित न ठेवता विविध स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा, यामुळे व्यक्तिमत्त्व विकास होतो. मुली विविध कलांमध्ये अव्वल असतात पण नंतर जबाबदाऱ्यांमुळे त्याकडे दुर्लक्ष करतात. त्यांनी आवड जोपासून त्यात करिअर घडवावे, असे मत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांनी व्यक्त केले.
श्री शिवाजी मराठा सोसायटीच्या इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च च्या वतीने युवा महोत्सवाचे आयोजन संस्थेच्या अरण्येश्वर कॅम्पस मध्ये करण्यात आले होते. यावेळी आंबेगाव पोलिस स्टेशनच्या सहाय्यक पोलिस निरीक्षक स्वाती देवधर, संस्थेचे मानद सचिव अण्णा थोरात, सहसचिव विकास गोगावले, खजिनदार जगदीश जेधे, नियामक मंडळ अध्यक्ष सत्येंद्र कांचन, महाविद्यालय विकास समिती अध्यक्ष डॉ. सुनील जगताप, सभासद संताजी जेधे, रघुनंदन जाधव, गंगाधरराव घारे व कमल व्यवहारे, प्रभारी संचालक डॉ. प्राजक्ता वराळे उपस्थित होते.
स्वाती देवधर म्हणाल्या, स्त्रीभ्रूण हत्या असो किंवा घरगुती हिंसाचार, महिलांना या अत्याचारांविरुद्ध लढण्यासाठी सक्षम बनवायचेच; परंतु आपल्या घरातील मुलांना, पुरुषांना सुसंस्कृत बनविणे गरजेचे आहे. काहीवेळा महिला देखील कायद्याचा गैरवापर करून पुरुषांवर अत्याचार करत असल्याचे समोर येते. अशा वेळी स्त्री-पुरुष समानता हा ध्यास न ठेवता स्त्री-पुरुष सहचर्य याची अंमलबजावणी केली, तर आपण नक्कीच वेगाने पुढे जाऊ.
डॉ. सुनील जगताप, सत्येंद्र कांचन यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्रमुख पाहुणे व संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना बक्षीस वाटप करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण केले.


